शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 422

१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार; दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार

दावोस, दि. 22 – दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

21) सिएट

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : नागपूर

 

22) व्हीआयटी सेमिकॉन्स

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 24,437 कोटी

रोजगार : 33,600

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

23) टाटा समूह

क्षेत्र : बहुविध क्षेत्रात

गुंतवणूक : 30,000 कोटी

 

24) रुरल एन्हान्सर्स

क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक

गुंतवणूक : 10,000 कोटी

 

25) पॉवरिन ऊर्जा

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 15,299 कोटी

रोजगार : 4000

 

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 15,000 कोटी

रोजगार : 1000

 

27) युनायटेड फॉस्परस लि.

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 6500 कोटी

रोजगार : 1300

 

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स

क्षेत्र : शिक्षण

गुंतवणूक: 20,000 कोटी

रोजगार : 20,000

 

29) ऑलेक्ट्रा ईव्ही

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक: 3000 कोटी

रोजगार : 1000

 

30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण

……….

दि. 21 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी

एकूण रोजगार : 1,53,635

………….

दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

 

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: 3,05,000 कोटी

रोजगार : 3,00,000

 

32) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 10,319 कोटी

रोजगार : 3200

कोणत्या भागात : चंद्रपूर

 

33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)

गुंतवणूक : 42,535 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : नागपूर

 

34) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग

गुंतवणूक : 21,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : रायगड

 

35) इंडोरामा

क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक: 10,200 कोटी

रोजगार : 3000

कोणत्या भागात : रायगड

 

36) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: 8641 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

37) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

38) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 1039 कोटी

रोजगार : 450

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

39) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : 10,000 कोटी

रोजगार : 2500

कोणत्या भागात : तळेगाव

 

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: 450 कोटी

रोजगार : 1100

कोणत्या भागात : एमएमआर

 

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : 12,780 कोटी

रोजगार : 2325

कोणत्या भागात : नागपूर

 

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : 14,652 कोटी

रोजगार : 8760

कोणत्या भागात : नागपूर

 

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : 300 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : जालना

 

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 5000 कोटी

रोजगार : 1300

कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

 

45) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : बुटीबोरी

 

46) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 1200

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

48) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 51,600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

49) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 8600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

50) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : 71,795 कोटी

रोजगार : 83,100

कोणत्या भागात : एमएमआर

 

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

 

52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर

 

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

…………..

दि. 22 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी

एकूण रोजगार : 15.75 लाख

शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

बारामती, दि. २२ : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

ॲड.कोकाटे म्हणाले,  राज्यातील शेतकरी प्रगतशील आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान, उत्कृष्ट बी-बियाण्याचा वापर केला पाहिजे. कृषी क्षेत्रात चांगले काम करणारे शेतकरी, कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरीता राज्य शासनावतीने सहकार्य  करण्यात येईल. केंद्र व राज्यशासन मिळून शेतकरी सुरक्षित आणि संरक्षित होण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध लोकल्याणकारी निर्णय घेण्यात येतील. आगामी काळात नवीन योजना राबविण्यासोबतच आवश्यकतेनुसार जुने कायदे व योजनेतही बदल करण्यात येतील.

तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान आदी घटकांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे.  कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान, पीकपद्धती तसेच कृषी क्षेत्रातील ज्ञान गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता प्रयत्न करण्यात आला आहे; आगामी काळात अशा प्रकारचे प्रदर्शन राज्यभर आयोजित करण्याकरीता प्रयत्न करण्यात येतील. केवळ महिलांकरीता अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करुन कृषी विषयक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पीकपद्धती आदींबाबत माहिती देण्यात येईल.

उमेद अभियान तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादन विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ॲड.कोकाटे म्हणाले.

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

श्री. भरणे म्हणाले, शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आधुनिकतेची कास धरुन शेती करावी. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करुन कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. बाजारपेठेत पिकांचे नवनवीन वाणदेखील उपलब्ध असून त्याचाही वापर करावा. कृषी विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करुन अधिकाधिक उत्पन्न घेतात. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासोबत विविध स्पर्धेत सहभागी होतात. आगामी काळात शेतीला चांगले दिवस आणण्याकरीता धोरण आणावे, अशी श्री. भरणे सूचना केली.

इंदापूर येथे २२ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित प्रदर्शानात कृषी व जनावरे,  घोडेबाजार व डॉग शो असणार आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला अधिकाधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

कार्यक्रमात ॲड. कोकाटे यांच्या हस्ते तालुक्यातील शैक्षणिक, कृषी, उद्योग आदी या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

श्री. जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. जगदाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
0000

रेल्वे दुर्घटनास्थळी पोहाेचून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हाताळली परिस्थिती

जळगाव दि. 22 ( जिमाका )जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहाेचून परिस्थिती हाताळली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटना स्थळी थांबून होते.

मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.

कागदी, प्लास्ट‍िकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी

मुंबई दि. 22 : कागदी तसेच प्लास्ट‍िक ध्वज वापरण्यास बंदी असून कापडी राष्ट्रध्वज वापरण्याचे निर्देश आहेत.

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तहसिल कार्यालयात व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या सर्व यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनाना देण्यात आले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर गठित करण्यात आल्या असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

विश्व मराठी संमेलनात प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. २२ – मराठी भाषा विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात मराठी ही या विश्व मराठी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्याअनुषंगाने या कालावधीत विविध भाषा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध प्रकाशन संस्था, ग्रंथविक्रेते तसेच मराठी भाषा आणि संस्कृती यासंबंधी वेगवेगळे उपक्रम करणाऱ्या संस्था यांना त्यांची पुस्तके/उत्पादने यांच्या प्रदर्शन/विक्री करिता दालने उपलब्ध करून देण्यात येतील.

या विश्व मराठी संमेलनात ग्रंथ/पुस्तके/उत्पादने यांच्या प्रदर्शन/विक्रीकरिता सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दि.२५ जानेवारी पर्यंत अर्ज project3.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावे. काही ग्रंथ दालने शासकीय विभागांसाठी राखीव असतील. दालनांचे वितरण / वाटप अधिकार दालन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

तरी इच्छुक प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपला सहभाग नोंदवावा. प्रदर्शनास उपस्थित राहणाऱ्या दोन प्रतिनिधींच्या आधार कार्डची छायाप्रत, आपल्या प्रकाशनाचे नाव, इ-पत्ता, संपर्क क्रमांकासहीत project3.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या श्रीमती सुरेखा कांबळे-साळवे संपर्क क्र. ८२९१७९५४८५ श्री. निलेश यादव संपर्क क्र ७७१०८९९७०४ यांच्याशी संपर्क साधावा, असे राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

 

विकासकामे पूर्ण वेगाने पुढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक

गडचिरोली, (जिमाका) दि.22 : राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेताना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कोणतीही विकास कामे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व विकासकामांमध्ये अडथळे येत असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.

 श्रीमती सौनिक यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाज जलद गतीने पार पाडण्याचे सूचना देतांनाच गडचिरोलीला डिजिटल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे सांगितले. त्यांनी शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसवून ऊर्जा बचत करण्याच्या सूचना दिल्या. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक पीक पद्धतीऐवजी द्विपीक किंवा बहुपीक पद्धती अंगीकारण्याचे व फळझाड लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक आयटीआयमधील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याचे व त्यात किमान 30 टक्के महिलांना रोजगाराची हमी दिली जाईल, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेसा कायद्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्थानिक स्तरावर ज्या अडचणी सुटू शकत नाही त्याची यादी माझ्याकडे पाठवावी मी त्या सोडविण्यासाठी 100 टक्के प्राधाण्य देईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले, यासोबतच विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली.

मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी गोंडवाना विद्यापीठातील सीआयआयआयटी प्रशिक्षण केंद्र व एकल सेंटरलाही भेट देवून पाहणी केली. डिजिटल कारपेंट्री युनिट व ई-बायसिकल उत्पादन युनिटची उभारणी करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात २२५ पदभरती

मुंबई,दि.२२ : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज सादर करावयाचा कालावधी

दिनांक २१ जानेवारी, २०२५ रोजी १४.०० ते दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची दिनांक  १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचे  दिनांक १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी

०००००००

राजू धोत्रे/विसंअ

महामार्गांवर महिला प्रवाशांसाठी प्राधान्याने सुविधायुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, दि. 22 : राज्यभरात विविध महामार्गांवरुन लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यामध्ये प्राधान्याने  महिला  प्रवाशांसाठी  सुविधायुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था उपलब्ध करुन देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह  भोसले यांनी दिल्या.

महामार्गांवरील महिला प्रसाधनगृहांच्या सुविधांबाबत मंत्रालय येथे आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले, महिला प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महामार्गांवरील पेट्रोलपंपांच्या शेजारी, टोल नाक्याजवळ किंवा इतर सुयोग्य ठिकाणी सुविधांयुक्त प्रसाधन गृहांची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य द्यावे. तसेच 25 किमीच्या रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावांमध्येच या बाबींचा समावेश करावा. सर्व स्वच्छतागृहांची रचना एकसारखी  ठेवावी.  त्याचप्रमाणे प्रसाधनगृहांच्या येथे कटाक्षाने स्वच्छता राखण्यात यावी. आवश्यक प्रमाणात लाईटची व्यवस्था ठेवली जावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रसाधन गृहांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रसाधन गृहांची व्यवस्थापन यंत्रणा महिला बाल विकास विभागाच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात यावी. स्थानिक महिला बचतगटांना व्यवस्थापनाचे काम सोपवण्यात यावे, जेणेकरुन नियमितपणे प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्याचे काम नियंत्रित केले जाईल, असे श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी सूचित केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बाल विकास विभागाकडून महिला बचतगटांना या कामात सहभागी करुन घेता येईल, असे सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ/

भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ

नवी दिल्ली, दि. 22: लाल किल्ला परिसरात भारत पर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या महोत्सवास महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.

दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते.  यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यातील चित्ररथ ही इथे असणार आहेत. दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल.

हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून, यावर्षी चित्ररथांसाठी   ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे.  या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ तयार केला.

मधमाशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.

असा असेल मधाचे गावचित्ररथ

चित्ररथाच्या पुढच्या भागात फुलांनी सजवेलेली मधमाशीचे आकर्षक शिल्प बसवले आहे.  या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत. भव्य मधमाशीच्या पंखांची हालचाल दाखवण्यात आली असून लहान मधमाशा हवेत उडताना दिसतील.

चित्ररथाच्या मागील भागात एक विशाल मधमाशाचे पोळ चित्रित करण्यात आले आहेत.  नैसर्गिकरित्या असणा-या मधुमाशींच्या पोळची अचूक प्रतिकृती बनविली आहे. मधमाशा त्यांच्याभोवती फिरताना दिसतात. मध उत्पादनाचे टप्पे मोठ्या मधाच्या पोळ जवळ दाखवले आहेत. मध व्यवसायातील महत्त्वपूर्ण उप-उत्पादने देखील दर्शविली आहेत. फुलांच्या परागीकरणातून रस शोषुन घेणाऱ्या मधमाशी प्रतिकृती दर्शविण्यात आली आहे. मध निर्मितीच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया दर्शविण्यात आले आहेत. मधमाशीपालनात वापरल्या जाणाऱ्या खोक्यांवर मधाचे गाव योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांची नावे लिहिली आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून हा चित्ररथ तयार झाल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

000000000000

पुणे महानगरपालिकेत थकित मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. २२ : पुणे शहर महानगरपालिकेमध्ये नवीन ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मनपाअंतर्गत थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

मंत्रालयात पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध विषयांबाबत बैठक राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, एस गोविंदराज, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, नगररचनाकार प्रतिभा भदाणे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, मालमत्ता कराच्या थकबाकीची वसूली करताना निवासी आणि व्यावसायिक असे वर्गीकरण करण्यात यावे. थकीत कर प्रलंबित राहिल्यास त्यावर दंडाची रक्कम वाढते. त्यामुळे मालमत्ताधारकांना अधिकचा बोझा बसेल. पुणे शहरात लष्करी छावणीचा भाग आहे. या भागाचा पुणे महानगरपालिका क्षेत्रात सहभाग करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. लष्करी छावणीचा महानगरपालिकेत समावेश झाल्यास तेथील मनुष्यबळाचा उपयोग होईल. तसेच सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत एकत्रित मानधनावर 168 सेवक कार्यरत आहेत. या सेवकांना सामावून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सफाई कामगार वारसा हक्क भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली असून याबाबत सामाजिक न्याय विभागाशी चर्चा करून शासन निर्णय काढण्यात यावा. पुणे शहरातील वृक्षांची संख्या, आवश्यक वृक्ष संख्या याबाबत पुणे शहरात वृक्ष गणना करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

पुणे मनपा व पीएमआरडीएने बांधकाम परवानगी देताना बांधकाम शुल्कातील 50 टक्के  हिस्सा संबंधित यंत्रणेला त्याचवेळी मिळण्यासाठी ऑनलाईन पेयमेंट व्यवस्थेत बदल करावा. हिलटॉप आणि हिलस्लोप जमिनींच्या आरक्षणाबाबत समिती करण्यात यावी. यामध्ये प्रकरणनिहाय आढावा घेण्यात यावा. पुणे शहरातील प्रकल्प बाधीत नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्त नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. हिल टॉप, हील स्लोप आणि बी. डी. पी बाबत निर्णय घेण्यात यावा. पर्वती टेकडी लगतची झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सर्वंकश योजना करण्यात यावी. या भागातील हेरीटेजची अट शिथील करून इमारत उंचीवरील मर्यादा हटविण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...