माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढविण्याचे कार्य करावे –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
9

नागपूर,दि.31 : जनसामान्यांच्या जडणघडणीत माध्यमांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे सामान्यजनांपर्यंत योग्य आणि राष्ट्रीय विचार पोहोचणे आवश्यक असते. माध्यमे कोणतीही असो, माध्यमांनी समाजाच्या सामाजिक जाणिवा वाढविण्याचे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या (दैनिक तरुण भारत) वाडी-हिंगणा मार्गावरील ‘मधुकर भवन’ या नव्या इमारतीचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. श्री. नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष डॅा. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर आणि प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाजाच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणण्याचे कार्य माध्यमांनी करणे अपेक्षित आहे. नकारात्मकता संपविणे हेच माध्यमांचे उद्दिष्ट असले पाहिजे. व्यवसायापेक्षा याठिकाणी विचारांना प्राधान्य मिळणे अपेक्षित असते.

बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माध्यमांमध्ये अनेक बदल आले आहेत. यामुळे माध्यमांच्या बाह्यरुपामध्ये बदल झपाट्याने होतो. तो व्हायला हवा. ज्यांनी हा बदल स्वीकारला नाही, ते काळाच्या मागे पडतील. मात्र, यामध्ये माध्यमांच्या मूळ वैचारिक गाभ्यात बदल होऊ नये. त्याला सकारात्मकतेची व राष्ट्रीयत्वाची जोड असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दैनिके ही विचारांनी प्रेरित असण्याची गरज आहे. ध्येयवाद हा गरजेचा आहे. सर्वसमावेशकता वृत्तपत्राची ओळख व्हावी. वैचारिक ओळखीसोबत सर्वसमावेशकता असणारी माध्यमे वाचकांना प्रिय असतात. सर्वसामान्यांसाठी लेखणीचा वापर होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी माध्यमांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. देशाला जागतिक सत्ता बनविण्यासाठी समाजाची बांधणी करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

दै. ‘तरुण भारत’ने 98 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त संपादकीय व व्यवस्थापन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात भैय्यासाहेब मुंडले, उदयभास्कर नायर, अनिल दांडेकर, विश्वास पाठक, लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक यांचा सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै. तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव यांनी केले. सूत्रसंचालन प्रगती किडे यांनी तर आभार डिजिटल आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here