श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

0
8

मुंबई, दि. १८ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरात धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचं वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

श्री गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, श्री गणेश चतुर्थी सणाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळे, गणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील, समाजातील सर्वांनी मतभेद, मनभेद विसरुन, एकत्र येऊन, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.

राज्यातील काही भागात अजूनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावे. शेतात धान्याच्या आणि घरात धनाच्या राशी याव्यात. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसह आपल्या सर्वांच्या जीवनात, सुख, समृद्धी, आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येवो. श्री गणरायांच्या कृपेनं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी केली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here