आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस

0
6

नागपूर, दि.12 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राजभवन येथे कौशल्य विकास विभागाद्वारे प्रकाशित ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे विमोचन व ‘स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, कौशल्य विद्यापिठाचे कुलगुरू डॅा.अपूर्वा पालकर, दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव डॅा.मुरलीधर चांदोरकर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे विमोचन औचित्यपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महापुरुषांनी समाज, देशाच्या कल्याणाठी फार मोठे काम केले. या महापुरुषांचे कौशल्यविषयक कार्य व विचार विद्यार्थ्यांना पुस्तकातून समजेल, असे राज्यपाल म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांजवळ कुशल मनुष्यबळ नसतांना देखील त्यांनी आपले उत्तम सैन्य उभारले, किल्यांची बांधणी केली. मोगलांचा सामना केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात शिक्षणाला प्रोत्साहन दिले. वीर सावरकर आपल्या वैज्ञानिक विचारधारेने ओळखले जातात. या महापुरुषांनी आपल्या काळात अवलंबिलेले कौशल्यविषयक कार्य ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे.

देशातील युवा पिढी कौशल्ययुक्त बनविण्यासाठी गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. देशातील बेरोजगारी कमी करण्यासोबतच देशाच्या उत्पादकतेत वाढ, सर्वसामान्य नागरिकांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी विविध कौशल्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात कौशल्य विकासासाठी आपल्याला गुंतवणुक करावी लागणार आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. दत्ताजींचे व्यक्तिमत्व समर्पित होते. एक व्यक्ती किती प्रकारचे कार्य करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण होते. दत्ताजींच्या नावाने सुरु करण्यात आलेला पुरस्कार दरवर्षी देण्यात यावा. महापुरुषांचे कौशल्यविषयक विचार पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची ही अभिनव कल्पना आहे. महापुरुषांचे सामाजिक विचारच नेहमी मांडले जातात. त्याची चर्चा व संशोधन होते. त्यांचे कौशल्यविषयक विचार देखील पुढील पिढीपर्यंत गेले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करतांना वापरलेले कौशल्य, डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी मांडलेले विचार अचंबित करायला लावणारे आहे. महात्मा फुलेंनी गरीब, वंचितांचा विचार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आर्थिक विचार मांडले. समाज कौशल्ययुक्त असला पाहिजे. मानवतेसोबतच मानव संसाधनांचा देखील त्यांनी विचार केला असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा यांनी दत्ताजी डिडोळकर यांनी संपुर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचे स्वप्न पुर्ण होत आहे. दत्ताजींच्या नावाने सुरु करण्यात आलेला पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. देशभर कौशल्य विकासाचे कार्य होत आहे. येत्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ हे पुस्तक त्यांना मार्गदर्शन करेल, असे सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. दत्ताजी डिडोळकर यांच्या सामाजिक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कौशल्य विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, डॅा.मुरलीधर चांदोरकर यांनी देखील विचार व्यक्त केले. प्रास्तविकात अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी पुस्तकाची निर्मिती व पुरस्कारामागची भूमिका विषद केली.

सुरुवातीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. तसेच विभागाच्यावतीने यावर्षापासून देण्यात येत असलेल्या दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार डॉ.अर्पिता करकरे, मोहन तेलंगी, बेबी संभा पोरतेट, संजयसिंग मोहारे यांना देण्यात आला. स्व.सुनील देशपांडे यांचा पुरस्कार निरुपमा देशपांडे यांनी स्विकारला.

कार्यक्रमाला आ.रामदास आंबटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.सुभाष चौधरी, व्यवसाय शिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

******

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here