पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय; पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन

0
5

मुंबई, दि. 9 : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फिनिक्स फाऊंडेशन संस्था, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिखर परिषदेमध्ये चार सत्रांमध्ये पर्यावरण बदलाविषयीच्या समस्या, बांबू लागवड म्हणजे काय, बांबू लागवडीचे महत्व आणि वातावरण बदलामध्ये बांबू लागवडीचे महत्व या विषयावर चर्चासत्रे झाली. या चर्चासत्रामध्ये बांबू लागवडीचे महत्व सांगताना मार्गदर्शकांनी बांबू लागवडीमध्ये असलेल्या संधी, बांबू लागवडीमधून साधता येणारी आर्थिक प्रगती, त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय असल्याचे मनोगत सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच बांबू लागवडीमध्ये भविष्यातील देशाच्या आर्थिक प्रगतीच्या  अनेक संधी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

या शिखर परिषदेमधील चर्चेमध्ये राष्ट्रीय बांबू मिशनचे संचालक प्रभातकुमार, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, आसाम बायो रिफायनरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भास्कर फुकन, अदानी एन्टरप्रायजेसचे अमोल जैन, मुठा इन्डस्ट्रीचे नीरज मुथा, सीएनबीसीच्या मनीषा गुप्ता, रेणुका शुगर्सचे अतुल चतुर्वेदी, पीस ॲन्ड सस्टेनिबिलिटीचे संदीप शहा, आंतरराष्ट्रीय बांबू संघटनेचे बोर्जा दे ला इस्कार्बो, टेरीचे अरुपेंद्र मुलिक, नॅशनल रिफाईन्ड एरिया ॲथॉरिटीचे अशोक दहिवाल, एमएसएमई क्लस्टरचे मुकेश गुलाटी, भारतीय विज्ञान संस्थेचे माजी प्रमुख के.पी.जे.रेड्डी, पर्यावरण कार्यकर्त्या निशा जांमवल यांनी सहभाग घेतला.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here