रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

0
3

रायगड, दि ०३ (जिमाका):  जिल्ह्यातील मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक यंत्रणातील सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करावेत.   मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी,  निवडणुका मुक्त, निर्भय, व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यासह  विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी  दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची ( होम वोटिंग)सुविधा दिली आहे.  याची अंमलबजावणी काळजीपूर्वक व्हावी. इपिक कार्ड घरोघरी जाऊन वाटप करावेत.  दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी ब्रेल वोटर स्लिप दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचतील याची दक्षता घेतली जावी.

मतदानाच्या दिवशी  मतदारांना सर्व आरोग्य विषयक सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवा, आवश्यकतेनुसार सुक्ष्म निरीक्षकांना करा, सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे. पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील  वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. मतदानावर परिणाम करणाऱ्या गैरसमज पसरविणाऱ्या संदेश व घटनांचे खंडन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. जावळे  यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. यामध्ये मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, आचार संहिता कक्षा तसेच इतर कक्ष करत असलेले कार्य, दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक  श्री.  घार्गे यांनी पोलीस विभागाने  केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता याबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी निवडणूक विषयक  विविध समितीनिहाय नोडल अधिकारी यांनी कामकाजाची माहिती सादर केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी मतदार जनजागृती व सहभागीता कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत झालेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच जिल्हा परिषदेमार्फत मतदान केंद्राअंतर्गत केलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.

यावेळी सर्व समिती प्रमुखांनी आपल्या कामकाजचे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here