शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
11

पुणे, दि. १४ : शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना पावसात कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये म्हणून दक्षता बाळगावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पुणे शहरात नुकत्याच झालेल्या पुर्व मान्सून पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए इत्यादी विभागांनी समन्वय साधून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

आपत्तीच्या ठिकाणी महानगरपालिकेने वेगाने प्रतिसाद द्यावा. शहर व परिसरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरीत काढावेत. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे रत्यावरील अतिक्रमण काढावेत. महानगरपालिकेने नाल्यांची साफसफाई त्वरीत करावी. जाहिरात फलकांचे सुरक्षा ॲडिट करावे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरित काढावेत असे सांगून नियमबाह्य जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पावसामुळे व वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्यास आधुनिक यंत्राचा वापर करून रस्ता वाहतुकीसाठी त्वरित मोकळा करावा. कात्रज ते रावेत चौक पुलावर पाणी येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने उपाययोजना करावी. वारजे जंक्शन जवळील सेवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक कार्यवाही करावी. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे. त्यासाठी आवश्यकता असल्यास अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.

श्री. भोसले म्हणाले पुणे शहरात साडे तीन हजार कचरा वेचक कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरात पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून कार्यवाही करण्यात येत आहे. चेंबर्स स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर जाळया टाकण्यात आल्या आहेत. वॉर्ड स्तरावर देखरेखीसाठी ४६ अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक वार्डला अधिकचे १५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. नागरिकांकडून आलेल्या सूचनेनुसार उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वार्ड निहाय अतिरिक्त निधी पुरविण्यात आला आहे. शहरातील १ हजार ८०० अनाधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी महानगरपालिका आणि पोलीस विभागाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात सादरीकरणानद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here