एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री अब्दुल सत्तार

0
12

वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)-  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून प्रत्यक्ष आढावा घेतला.  आज पालकमंत्र्यांनी सिल्लोड तालुक्यातील भराडी, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी तर कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, रामनगर, साखरवेल, वासडी, महेगाव हस्ता, पळशी खुर्द शिवारात बाधित भागाचा दौरा करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

सद्यस्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झाले असून, जिल्ह्यातील नदी-नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील शेतीपिकांसह गुरे-ढोरे, पशुधन, दुभती जनावरे वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्याने रस्ते आणि पुलांचे भाग तुटल्यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here