महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

निर्जनस्थळी पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते वेळी सायरनचा वापर करण्याचे पोलिसांना निर्देश

0
70

 पुणे, दि. 5 : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश दिल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. गस्त घालते वेळी सायरनचा वापर करावा. निर्जन स्थळी असलेल्या पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षितेतेच्या दृष्टीने नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी अशी सूचना पुणे पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यांचेवर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावी. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निर्मूलन कक्ष, अंध श्रद्धा निर्मूलन कक्ष  तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे.

काही ठिकाणी घरातील व्यक्तिंकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येवून पोलीसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कूल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक ‘बॅड टच गुड टच’ याची कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे. शहरात नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टिने प्रयत्न सूरू आहेत.

पोलीसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई संदर्भातील यशकथा प्रसारमाध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. पुणे शहर व परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर राहण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here