कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

सोलापूर, दि.05 : कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली . खेड्यापाड्यातील मुले शिक्षणापासूण वंचित  राहू नये, त्यांना चांगले शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह काढले. मामांचे शैक्षणिक कार्य अत्यंत प्रतिकूल परस्थितीत निर्माण झाले असून,  त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री.एन. एन. जगदाळे, जनरल सेक्रेट्ररी श्री.पी.टी.पाटील, जाँईट सेक्रेटरी श्री.ए.पी.टेबडवार,खजिनदार श्री.शितोळे, विदयार्थी,आदी मान्यवर  मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, वसतिगृह चालविण्यासाठी  मामांनी  लोकांकडून धान्य गोळा करणे निधीची उपलब्धता करणे यासाठी अथक प्रयत्न केले. वसतिगृह चांगल्या प्रकारे सुरू झाले. लोकांनी दिलेले दान सत्पात्री लागावं आणि ते जगदाळे मामांच्या रूपाने सत्पात्री लागत होतं त्यामुळे लोकांनीही भरभरून दान दिले. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी  या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर. या दोन्ही व्यक्तींचे कर्तव्य मोठे आहे. शास्त्रज्ञाला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः कष्ट करून मोठे व्हावे लागते असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे प्रचंड मोठे काम डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी केले असल्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी  डॉ.अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, यांना राज्यपाल श्री.हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह,सन्मानपत्र रुपये एक लाख रुपयांचा धनादेश देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.