‘जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जयपूर डायलॉग डेक्कन समिट

पुणे, दि. 8 : जयपूर डायलॉगने राष्ट्रीय विचारांना एक व्यापक मंच उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीसमोर आणण्याचे कार्यही या माध्यमातून केले जात आहे. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हॉटेल हयात येथे  आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या ‘जयपूर डायलॉग’च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणे आवश्यक आहे. जलद गतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषय हाताळण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे. महाराष्ट्रातील नवमतदारांच्या संख्येसंदर्भात ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये व्यापक मतदार जनजागृती अभियान घेऊन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. याआधी फक्त १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवाराला मतदार यादीत नाव नोंदणी करता येत होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जून  व १ सप्टेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली असेही त्यांनी सांगितले.