भारतामध्ये लाखो मुले दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या शोषण, अत्याचार आणि दुर्लक्षाला सामोरे जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित मदतीसाठी भारत सरकारने १०९८ चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. हा एक टोल-फ्री क्रमांक असून, संकटात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी 24X7 कार्यरत असतो. चला जाणून घेऊया या हेल्पलाइनचे महत्त्व, कार्यपद्धती…
१०९८ चाइल्ड हेल्पलाइन: काय आहे आणि कशी कार्य करते ?
१०९८ चाइल्ड हेल्पलाइन ही एक राष्ट्रीय आपत्कालीन सेवा आहे, जी 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कार्यरत आहे. संकटात सापडलेल्या किंवा असुरक्षित स्थितीत असलेल्या मुलांना संरक्षण, समुपदेशन, पुनर्वसन आणि अन्य गरजेच्या सेवा पुरवण्याचे काम ही हेल्पलाइन करते. देशभरातील कोणत्याही फोनवरून १०९८ हा क्रमांक डायल करून त्वरित मदत मिळू शकते.
या हेल्पलाइनच्या माध्यमातून तज्ज्ञ समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते मुलांना मानसिक आधार, कायदेशीर मदत, पुनर्वसन सुविधा आणि गरजेनुसार इतर सेवांसाठी मार्गदर्शन करतात.
1098 हेल्पलाइन कोणत्या परिस्थितीत मदत करू शकते?
ही सेवा संकटात असलेल्या मुलांसाठी अनेक प्रकारे मदत करू शकते. खालील परिस्थितींमध्ये १०९८ वर संपर्क साधला जाऊ शकतो
- हरवलेले किंवा पालकांशिवाय असलेले मुले: जर एखादे बालक हरवले, मुलगा मुलगी हरवली असेल असेल किंवा कोणत्याही पालकाविना आढळले तर १०९८ च्या माध्यमातून त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाते.
- शोषण किंवा अत्याचार होत असेल: शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांना संरक्षण आणि कायदेशीर मदत पुरवली जाते.
- बाल विवाह आणि बालकामगार: मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे बाल विवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी १०९८ वर तक्रार नोंदवता येते.
- भिक्षा मागणारी मुले किंवा व्यसनाधीनता: बालक जर भिक्षा मागताना दिसला किंवा व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला योग्य मदत मिळवण्यासाठी १०९८ वर कॉल करता येतो.
- शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित समस्या: शिक्षणापासून वंचित असलेल्या किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या मुलांना आवश्यक सेवा पुरवण्याचे काम हेल्पलाइन करते.
- अनाथ, समर्पित किंवा दत्तक घेण्यास पात्र मुले: पालकविना राहणाऱ्या किंवा पुनर्वसन आवश्यक असलेल्या मुलांसाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळते.
१०९८ चाइल्ड हेल्पलाइनद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा
ही हेल्पलाइन फक्त तक्रारींचे नोंदणी केंद्र नसून, संकटात सापडलेल्या मुलांना संपूर्ण मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते :
समुपदेशन
मुलांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध असतात. हे समुपदेशन बालकांना त्यांच्या परिस्थितीतून सावरायला मदत करते.
त्वरित हस्तक्षेप
जर एखाद्या मुलाला तातडीने मदतीची गरज असेल, जसे की अत्याचार किंवा बालमजुरीच्या स्थितीत असेल, तर स्थानिक प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या सहकार्याने त्वरित कारवाई केली जाते.
रेफरल सेवा
जर एखाद्या मुलाला पुनर्वसन, शिक्षण, वैद्यकीय मदत किंवा पुनर्स्थापनेसाठी विशेष सेवांची गरज असेल, तर हेल्पलाइन त्या संबंधित संस्थांकडे त्याचा तपशील पाठवते.
माहिती आणि मार्गदर्शन
१०९८ च्या माध्यमातून बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता पसरवली जाते. पालक, शिक्षक आणि नागरिकांसाठीही ही सेवा मार्गदर्शन करते, जेणेकरून मुलांचे संरक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.
१०९८ चाइल्ड हेल्पलाइनचा प्रभाव
ही हेल्पलाइन सुरू झाल्यापासून लाखो मुलांना मदत मिळाली आहे. खालील महत्त्वाचे परिणाम यामुळे दिसून आले आहेत: 10 दशलक्षाहून अधिक कॉल्स: हेल्पलाइनला दरमहा सरासरी 50,000 हून अधिक कॉल्स प्राप्त होतात. 5 दशलक्षाहून अधिक मुलांना मदत: दुर्लक्ष, शोषण, बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या समस्यांवर वेळेत कारवाई करण्यात आली आहे. 1 लाखांहून अधिक मुलांची सुटका: संकटात सापडलेल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत
१०९८ हेल्पलाइनसाठी नागरिकांची जबाबदारी
कोणत्याही समाजाचे भविष्य हे त्याच्या मुलांच्या सुरक्षिततेवर आणि विकासावर अवलंबून असते. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, संकटात सापडलेल्या मुलांची मदत करण्यासाठी योग्य ती तक्रार 1098 वर नोंदवावी.
आपण काय करू शकतो ?
- सतर्क राहा: जर आपल्या आजूबाजूला बालकांचे शोषण, दुर्लक्ष किंवा अत्याचार होत असल्याचे आढळले, तर १०९८ वर कॉल करा.
- जागरूकता वाढवा: 1098 चा प्रचार करून अधिकाधिक लोकांना या सेवेबद्दल माहिती द्या.
- सहकार्य करा: प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून संकटात असलेल्या मुलांना मदत करा.
१०९८ चाइल्ड हेल्पलाइन ही भारतातील असंख्य संकटग्रस्त मुलांसाठी जीवनरेखा ठरली आहे. ही सेवा केवळ मदतीचा एक मार्ग नसून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठे पाऊल आहे.
मुलांचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन १०९८ चा योग्य वापर केल्यास, अनेक निरपराध बालकांचे जीवन सुरक्षित आणि आनंदी बनवू शकतो. चला नांदेड जिल्ह्यातील या कामात मदत करूया ! वंचित शोषित असाह्य मुले कुठे आढळल्यास एक शून्य नऊ आठ चा उपयोग करूया!
-प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
००००