वर्ध्यात १९६९ सालात ४५ वे व जिल्ह्यातील पहिले अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते, एखाद्या गावात साहित्य संमेलन झाल्यावर त्या क्षेत्रात उत्साह असतो, परंत,; १९७० ते १९८० हे दशक यादृष्टीने कोरडे असल्याचा प्रत्यय येतो. तर त्यापुढील दशक साधारणतः १९८० नंतरचा कालखंड वर्धा जिल्ह्यातील साहित्य विश्वाला चळवळीला ऊर्ध्वावस्था प्राप्त करून देणारा ठरला आहे.
प्रा. किशोर ‘सानप, प्रा. नवनीत देशमुख यासारख्या समीक्षक- लेखकांनी नोकरीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आणि जिल्ह्याच्या साहित्य क्षितिज उजळून निघू लागले, सुरुवातीला डॉ. किशोर सानप यांच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघाचे कार्य जोर धरून यातूनच पुढे राजेंद्र मुंढे, सतीश पावडे, मनोज तायडे, प्रशांत पनवेलकर, अशोक चोपडे आणि संजय इंगळे तिगावकरांसारखी नवी पिढी पुढे आली. डॉ. हेमचंद्र वैद्य यांचे हिंदी-मराठीतील लेखन, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी, त्यांनी केलेले विज्ञान कवितेच्या लेखनाचे प्रयोग, पुढे कादंबरी, कथा, कविता, पटकथा संवाद लेखक म्हणूनही नावलौकीक मिळाले.
नवनीत देशमुख यांची ‘अंगणवाडी‘, ‘झेड.पी‘ व ‘माणसाळलेला‘ ह्या कादंबऱ्या, ‘ममी‘, ‘काळा गुलाब‘, ‘टेकओव्हर‘ हे कथासंग्रह, तर डॉ. किशोर सानप यांच्या ‘ऋतू‘ कवितासंग्रह, ‘पांगुळवाडा‘, ‘हारास व ‘भूवैकुंठ‘ या कादंबऱ्या, तेवीस समीक्षाग्रंथ आणि दोन कथासंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा डॉ. किशोर सानपांनी निर्माण करून एक साक्षेपी समीक्षक व संत साहित्याचे मीमासक म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेली ‘खेळघर’ कादंबरी गाजली, प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे यांनी कविता, कथा, समीक्षा लेखन करीत राष्ट्रसंत तुकडोजी हे चरित्र, बंडखोर खेड्यांची गोष्ठ (आष्टीच्या १९४२ लढ्याची गाथा), राष्ट्रसंतांचे मौलिक विचार, डॉ. किशोर सानप व्यक्ती आणि वाड्मय, ‘वरदा … वर्धा’. आणि दोन प्रौढ साहित्याची पुस्तके, दोन बालनाटिका, अनुवाद लेखन असे चौफेर मुसाफिरी करीत आहेत त्यांची पाच पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.
डॉ.सतीश पावडे नाटककार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य समीक्षक, नाट्यशिक्षक -प्रशिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. नाटक, समीक्षा, चरित्र, अनुवाद, रूपांतर तसेच संपादित अशी एकूण २६ पुस्तके आजतागायत प्रकाशित झालेली आहेत. ३८ नाटकांचे दिग्दर्शन, २१ एकांकिका-नाटकांचे लेखन, २० नाटकांचे अनुवाद /रूपांतरही त्यांनी केले आहे. “मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर” हे त्यांचे पुस्तक सध्या चर्चेत आहेत.
समीक्षक डॉ. मनोज तायडे यांची कवी नारायण सुर्वे यांची काव्यदृष्टी, आस्वादक समीक्षा आणि कर्मयोगी गाडगेबाबा ही पुस्तके, सत्यशोधक साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक चोपडे यांचेही योगदान मोठे आहे. त्यांची आधुनिक मराठी कवितेचे जनक जोतीबा फुले, विदर्भातील सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक व्यंकटराव गोडे कृत साप्ताहिक ब्राह्मणेतर मधील अग्रलेख तसेच त्यांची आठ संपादित पुस्तके सत्यशोधकी साहित्याचे संशोधन आणि अन्वेषण करणारी ठरली आहे. कवी प्रशांत पनवेलकर ‘पूर्वा’ या आपल्या पहिल्या कवितासंग्रहातून आणि अलीकडील ‘नवा पेटता काकडा’ च्या रूपाने काव्यप्रांतात स्थिरावलेले एक महत्त्वाचे नाव ठरले आहे.
समीक्षेच्या क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेले डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांचे सृजनाचे झरे, विदग्ध प्रतिभावंत: विश्राम बेडेकर, हिंडणारा सूर्य, सर्किट परमात्मा हे प्रायोगिक कादंबरी लेखन दखलपात्र ठरले आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. पुरुषोत्तम कालभूत, कविता -गझल लेखनात अग्रेसर असणारे संजय इंगळे तिगावकर यांचे ‘अंगारबीज आणि दोलनवेणा’ हा कवितासंग्रह नंतरचे गझल लेखन उत्साहवर्धक आहे.
युवा कादंबरीकार प्रतीक पुरी यांनी वैनतेय, मेघापुरुष, वाफाळलेले दिवस, पाखंडगाथा यासारख्या तरुणांच्या मनाची स्पंदने टिपणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आजचे आघाडीचे समीक्षक आणि कवी नीतीन रिंढे यांचे महाविद्यालयीन शिक्षण तसेच वाड्मयीन जडण घडण संस्कार याच भूमीत झालेत. सुप्रसिद्ध कवी – अनुवादक प्रफुल्ल शिलेदार (काही वर्ष) आणि कवी तीर्थराज कापगते यांचे शालेय शिक्षण वर्ध्यातच झालेले आहे.
शिक्षक म्हणून नोकरीसाठी वर्ध्यात राहिलेले कथाकार सतीश तराळ, सर्वधारा चे संपादक व कवी सुखदेव ढाणके, तांडाकार आत्माराम कानिराम राठोड, रवींद्र जवादे, जुन्या पिढीतील रामदास कुहिटे हे बोल अंतरीचे, कुरुक्षेत्र हे काव्य, म.ना. घाटूर्ले, निसर्गकवी अनंत भिमणवार यांचा रानबोली, प्रभाकर पाटील, प्रभाकर उघडे यांचा स्वप्नातल्या कळ्या, भालचंद्र डंभे, प्रमोद सलामे, दिलीप वीरखेडेचा ऐन पस्तिशीच्या कविता संग्रह उल्लेखनीय आहे, प्रशांत झिलपे, प्रशांत ढोले, श्रीकांत करंजेकर, दिलीप गायकवाड, सुरेंद्र डाफ, चंद्रकांत शहाकार, नारायण नखाते, वीरेंद्र कडू यांचे उकंड्या आणि कुळस्वामी बळीराजा हे दोन ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहे. हिंगणघाट येथील आशिष वरघने एक कथाकार व कादंबरीकार म्हणून उदयास येत असून अभिजीत डाखोरे कथालेखनात अग्रेसर आहेत.
स्त्रीवादी दृष्टीकोनातून आणि जाणीपूर्वक लेखन करणाऱ्या लेखिका म्हणजे उषाताई देशमुख होत, स्त्री लेखनाची परंपरा वर्ध्यात रुजविणाचा आणि अग्रणी लेखिका म्हणून उषा देशमुख यांना मान द्यावाच लागतो, त्यांचा ‘दरवळ’ कवितासंग्रह. त्यांनी त्यावेळी केलेले गद्य लेखन तत्कालीन प्रतिष्ठित नियतकालिकातून वाखाणल्या गेले. सुमारे पन्नास वर्षे त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केलेले दिसते. डॉ. सुनिता कावळे यांनी ‘उत्तर’, ‘कमला लेले‘, ’व्रतस्थ’ व ‘अजिंक्य‘ ‘कॉलनी आजी’ या बाल कादंबऱ्या, बाल नाटके, एकांकिका असे विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन करून स्त्रीलेखनाच्या दालनाला समृद्ध केले. त्यांचा वारसा आणि स्त्री संघर्षाच्या गाथा दीपमाला कुबडे, अनुराधा ही कादंबरी तर दीपमाळ गझलांची, स्वप्नगंधा, आयुष्याच्या या वळणावर इत्यादी अन्य दोन काव्यसंग्रहातून मांडतांना दिसतात, तर विदर्भातील एकमेव यशस्वी प्रकाशिका आणि लेखिका अरुणा सबाने यांच्या मुन्नी, विमुक्ता आणि मी सूर्याला गिळले ही आत्मचरित्रात्मक कादंबरीतून स्वतःच्या पायावर कर्तृत्वाचं बळ प्राप्त करून, स्वतःसह समचारणीला जगण्याचे उर्जास्रोत ठरणाऱ्या नायिका जोरकसपणे उभ्या केल्या आहेत.
काही वर्षे येथे वास्तव्यात असणाऱ्या इंदुमती जोंधळे, तारा धर्माधिकारी आणि लक्ष्मी गेडाम यांनीही कथालेखन केले आहे. सद्ध्या मुंबई स्थित असलेल्या प्रतिभा सराफ याचं जन्मस्थान सेवाग्राम आहे. सुमती वानखेडे यांच्या मनोमनी, श्रावण भुलाव्याचे, कृष्णडोह, जाणता अजाणता, बंद उन्हाळसावली, हे वर्तुळ असेच असते, सायलेन्ट ऑब्झर्व्हर या त्यांच्या काव्य व ललित लेखनातून आत्मप्रत्ययाचा सहजोद्गार उमटलेला दिसतो, सुनिता झाडे यांच्या कॉमन वुमन, आत्मनग्न, या काव्यातून स्त्रियांच्या अंतर्मनातील हळूवार संवेदनाची स्पंदने टिपल्या गेली आहेत, डॉ . स्मिता वानखेडे यांचे समीक्षालेखन प्रगल्भ आहे, डॉ. मधुलिका जुननकर, डॉ. विजया मोरोणे, वीणा कावळे देव, प्रा. विमल थोरात, मीना कारंजेकर ओंझळभर प्रकाशासाठी कवितासंग्रह व क्रांतिकारी ऋषी विनोबा चरित्र, मंजुषा चौगावकर, ऋता देशमुख खापर्डे, कथाकार कल्पना नरांजे, नूतन माळवी यांची फुले – आंबेडकरी जाणीवेतून करीत असलेले लेखन लक्षवेधी ठरत आहे- सुषमा पाखरे, जयश्री कोटगीरवार ‘वनहरिणी’, किरण नागतोडे, सुहास चौधरी यांची घरंट व आभाळ पेलताना, इंदुमती कुकडकर यांच्या दोन कादंबऱ्या गराडा, अक्षदा प्रकाशित झाल्या आहेत.
आशा निंभोरकार ह्या वऱ्हाडी कथा लेखिका आहेत. मूळ वर्धेकर असणाऱ्या आता नागपूरकर असणाऱ्या मृणालिनी केळकर यांनी बंगाली लेखिका आशापुर्णादेवी यांच्या साहित्याला मराठीत आणण्याचे महनीय कार्य केले तर रंजना पाठक यांनी गंगोपाध्याय यांच्या साहित्याचा केलेल्या अनुवादाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे, या दोन स्त्री लेखिकांची अनुवादाच्या क्षेत्रातील ही उत्तुंग भरारी लक्षणीय आहे.
दलित साहित्याची उज्वल परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. ‘पतितपावन दास सारखे काळाराम मंदिर प्रवेश चळवळीतील मुख्य त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रगाढ विश्वास होता तसेच आर्वीचे पुरोहित, आंबेडकरी विचारवंत डॉ. मधुकर कासारे, नुकतेच निवर्तलेले सुर्यकांत भगत यांची बुद्ध, कबीर यांचे ह्यांच्या साहित्यावर संशोधन आणि अनुवादाचे मोठे कार्य केले. कथाकार द्वय डॉ. अमिताभ यांचे कथासंग्रह: पड । ललकार । अंधारयात्री। प्रकाशकाकडे प्रकाशनाच्या मार्गावर: ये सोनेका टैम नहीं, अभ्यास करो। योगेंद्र मेश्राम यांचे तीन कथासंग्रह लोकनुकंपा हे त्रैमासिक संपादन तर डॉ. प्रदीप आगलावे उगवता क्रांतिदूत, फुले फुलली श्रमाची व रजनी ह्या कादंबर्या , डॉ इंद्रजीत ओरके यांचे गद्य लेखन, ‘आग्ट’कार अशोक बुरबुरे हे आंबेडकरी कवी / गीतकार / गझलकार / नाटककार म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. प्रा. डॉ. सुभाष खंडारे यांचे कविता संग्रह व समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत. मनोहर नरांजे यांची. सर्पगंधा, लोकयात्रा (कविता संग्रह ) पुरात्तत्वविय शोधयात्रा, सरस्वती प्रवाह आणि प्रतीक ही प्रकाशित पुस्तके आहेत.
विनोद राउत हे कविता व समीक्षा लेखन करीत आहेत. वैभव सोनारकर यांचे ब्लू कवितासंग्रह दलित – आंबेडकरी कवितेचा आजचा आवाज आहे. दीपक रंगारी यांची ‘माय’ ही कविता एक वेगळे वैशिष्ट्य राखून आहे. मनोहर नाईक यांचा युद्धशाला, भूषण रामटेके यांचे तीन कवितासंग्रह व समीक्षाग्रंथ प्रकाशित आहेत. सहा कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, चार समीक्षा ग्रंथ निर्माण करणारे मिलिंद कांबळे हे लिहिते लेखक आहेत. कृष्ण हरले साहुरकर, प्रशान्त ढोले, संजय ओरके यांचेही कविता लेखनात सातत्य दिसून येते. मोरेश्वर सहारे, राजेश डंभारे, संदीप धावडे व प्रमोद नारायणे हे कवी पुढे येत आहे.
जिल्ह्यातील आदिवासी साहित्यिकांनी साहित्य, भाषा, संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे, यातील अग्रणी असलेले व्यंकटेश आत्राम प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ‘ (१९८९), ‘दोन क्रांतिवीर‘ (१९६८) ‘आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी समाज : समज-गैरसमज‘ (१९८७) हे तीन संशोधनग्रंथ त्यांच्या प्रकांड बुद्धिमत्तेची साक्ष देणारे आहेत. बुद्धिनिष्ठ आणि भावनिष्ठ हे दोन्ही लेखनप्रकार हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या या कार्याला काही अंशी मारोती उईके, डॉ. विनोद कुमरे हे पुढे नेत आहेत. राजेश मडावी, मारोती चावरे, रेखा जुगनाके व सुनील भिवगडे यांचेही कविता लेखन महत्त्वाचे आहेच.
साहित्य आणि पत्रकारिता एकमेकांच्या हातात हात घालून चालत असते वर्ध्यात याचा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्यंतर आलेले दिसते. जीनदासजी चवडे हे जैन धर्मीय वर्ध्यातील पत्रकार व पहिले प्रकाशक होत. त्यांनी १८९७ साली या व्यवसायाचा आरंभ करून जैन भास्कर हिंदी पत्रिका सुरु केली, तर १९०९ मध्ये जैन बंधू वार्तापत्र सुरु केले. याव्यतिरिक्त साप्ताहिक ब्राह्मणेतरचे पत्रकार- व्यंकटराव गोडे, मा. गो. वैद्य व दि. मा. घुमरे हे दोघेही तरुण भारताचे मुख्य संपादक राहिले आहेत, तर वामनराव घोरपडे व भा. शि. बाभले यांनीही सामाजिक बांधिलकीतून प्रबोधनपर पत्रकारीतेचे धडे गिरवित वृत्तपत्रसृष्टीत आपले स्थान आढळ केले, तर वर्तमान काळात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे आघाडीचे ‘अनुभव’ मासिकाचे संपादक सुहास कुलकर्णी हे देखील वर्ध्याचे सुपुत्र होत.
साहित्य- संशोधन -वैद्यकीय – कला – राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व वरदायिनी वर्धेच्या तीरावर विराजित होती जमनालाल बजाज, कमलनयन बजाज,राहुल बजाज, डॉ. पांडुरंग खानखोजे, बँ. मोरेश्वर अभ्यंकर, वसंतराव साठे, दत्तोपंत बा. ठेंगडी , डॉ . शरद दीक्षित, हेमंत करकरे, बापूरावजी देशमुख ही उत्तंग व्यक्तिमत्त्वे ‘वर्धामाय’ ची लेकरे होतं.
डॉ. राजेंद्र मुंढे
आर्वी नाका, ज्ञानेश्वर नगर, वर्धा
चलभाष ९४२२१४००४९