प्रदूषणमुक्त वने आणि पर्यावरण यासाठी उपाययोजना करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

राज्यात १ हजार २३९ हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ

ठाणे, दि. १ मार्च (जिमाका) :- महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात कांदळवन क्षेत्रात 1 हजार 239 हेक्टरने वाढ झाल्याची माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज येथे दिली.

ऐरोली सेक्टर 10 येथील जैवविविधता केंद्र जेट्टी ते बेलापूर येथील जेट्टी असा पाहणी दौरा वने मंत्री गणेश नाईक यांनी आज खाडीमार्गे केला. श्री. रामाराव, श्रीमती सावंत, श्रीमती पवार, श्री. गजभिये, श्री. बहादुरे हे कांदळवन विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता श्री. अरदवाड आणि युडीडीपी श्री. केकाण हे अधिकारी या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.

राज्य शासनाने दिलेल्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हा पाहणी दौरा एक भाग होता. जैवविविधता केंद्राला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या ठिकाणी पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांना  पोषक असे वातावरण कायम ठेवण्याचा वन विभागाचा प्रयत्न असतो. पूर्वी काही हजारांमध्ये असलेल्या फ्लेमिंगोची संख्या आज दीड लाखाच्या घरात गेली आहे. समुद्राच्या पाण्यावर दिसणारे प्लास्टिक, तेलाचा तवंग, प्रक्रिया न करता  सोडण्यात आलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी उपाय योजना करण्याची सूचना नामदार नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना केली. त्याचबरोबर या विषयाशी संबंधित उद्योग, पर्यावरण, बंदरे या विभागांबरोबर यानुषंगाने चर्चा करण्याचे निर्देशदेखील दिले.

राज्यात मागील दोन वर्षांमध्ये 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. खारफुटी पुनर्रोपणासारखे कार्यक्रम वनविभाग राबवित आहे. कोस्ट गार्ड तर्फे खाडी किनारी अतिशय आधुनिक उपकरणांसह नियमित गस्त सुरू असते.  कांदळवनांचे नुकसान होत नाही ना याकडे बारीक लक्ष ठेवले जाते. त्यामुळे खाडीतील कांदळवने सुरक्षित आहेत. ज्या  ठिकाणी कांदळवनांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी सुरुवातीला संबंधित घटकांना समजावून सांगण्यात येईल. त्यानंतरही अतिक्रमणे  हटवली नाहीत तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री श्री. नाईक यांनी स्पष्ट केले. प्रवासी आणि मच्छिमारांसाठी दिवाजेट्टी 24 तास वापरण्यायोग्य करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

ऐरोली मध्ये जैवविविधता केंद्र येथे वनविभागाच्या वतीने खारफुटी वूड वॉकची निर्मिती केली जाणार आहे. गोराई येथे अशा प्रकारचा वूड वॉक अगोदरच तयार करण्यात आलेला आहे. लाकडाच्या पुलावरून चालत खारफुटी पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. प्लास्टिक मुक्त शहर, प्रदूषणमुक्त वने आणि समुद्र यासाठी जन सहभाग आणि जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

00000