‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ञ विजय कोळेकर यांची १८ ते २२ मार्च दरम्यान मुलाखत

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-२ ची अंमलबजावणी’ या विषयावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री.कोळेकर यांची मुलाखत उद्या मंगळवार दि. १८ बुधवार दि. १९, गुरुवार दि. २० शुक्रवार दि.२१ आणि शनिवार दि. २२ मार्च २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुचेता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. राज्यात ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-२’ राबविण्यात येत असून सर्व दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पाणी आणि हवेच्या परिस्थितीनुसार शेती करणे तसेच शेतविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेतीतील कर्ब उत्सर्जन कमी करणे आणि पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी याविषयी या प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता तथा मृदा विज्ञान तज्ञ श्री. कोळेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००००