नवी दिल्ली, दि. १७ : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. पद्म पुरस्कारांची नामांकने केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले असून याबाबत प्रक्रिया १५ मार्च २०२५ पासून प्रारंभ झाली आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in) या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन सादर करण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री यांचा समावेश असून हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार आणि औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान केले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.
नामांकन करण्यासाठी आणि योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: स्त्रिया, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग आणि नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नामांकन सादर करताना, व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती ८०० शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक आहे. यासंबंधी अधिक माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in संकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर https://padmaawards.gov.in उपलब्ध आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
००००
सौजन्य पीआयबी/वृत्त वि. क्र.71/ दिनांक 17.03.2025