मुंबई, दि. २१ : इचलकरंजी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्त्रोत, कृष्णानदीवरील मजरेवाडी उद्वभव या अस्तित्वातील योजनांचे बळकटीकरण करावे. त्याबरोबरच तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करावा. पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.
इचलकरंजी शहराला सध्या पंचगगा नदी तसेच मजरेवाडी उद्भव योजनेतून ४५ दललि पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची वाढ तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी म्हैसाळ बंधारातून पाणीपुरवठा, दूधगंगा कॅनालमधून रेंदाळ येथील खाणीमध्ये पाणी साठवण करणे तसेच दूधगंगा कॅनॉलवरील पाझर तलावांचा स्त्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायांचा विचार करून अभ्यास अहवाल सादर करावा. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. इचलकरंजीसाठीही असा प्रकल्प उभारता येईल का याचाही विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. दूधगंगामधून कॅनॉलद्वारे येणारे पाणी बंद पाईपलाईनमधून आणता येईल का याचाही अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री दिले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इचलकरंजी शहराला म्हैसाळ बंधाऱ्यातून किंवा शिरटी योजनेतून शाश्वत व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची सूचना केली.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सध्या अस्तित्वातील योजना सुरू ठेवून दूधगंगा कॅनालमधून येणारे पाणी रेंदाळ गावजवळील खाणींमध्ये साठवून वापर करता येईल, असे सांगितले. दूधगंगा कॅनॉलची दुरुस्ती व अस्तरीकरण करून तसेच कॅनॉल ऐवजी बंद पाईपलाईन करण्यासंबंधीचा पर्याय असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही, अशा योजना राबविण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटी, अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आदी यावेळी उपस्थित होते.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ