मुंबई, दि. ११ :- मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. जागतिक दर्जाच्या या परिषद आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून यामुळे जगातील ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट’ क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे. यामुळे भविष्यात ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी’चे नेतृत्व भारत करेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्हज) २०२५ या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक परिषदेचे आयोजन १ ते ४ मे २०२५ दरम्यान ‘जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे होणार आहे. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुण, सृजनशीलता दाखविण्याची संधी आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल. जगाला भारताची नवी ओळख करून देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.
करमणूक क्षेत्राची अर्थव्यवस्था अतिशय जलदगतीने विकसित होत आहे. यात भारताने देखील अग्रेसर असले पाहिजे ही भूमिका आहे. ‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने शंभर पेक्षा अधिक देश भारतात सहभागी होणार आहेत. पाच हजार पेक्षा अधिक सहभागींची नोंद होणार असून ही परिषद दरवर्षी मुंबईत होणार आहे. त्यामुळे मुंबईचे महत्व जागतिक पातळीवर वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाची मालाडला २४० एकर जागा आहे. या जागेवर जागतिक दर्जाच्या एंटरटेनमेंट हबची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे जगातील करमणूक क्षेत्रातील नामवंत मुंबईकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर आयआयसीटी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी नावाची संस्था मुंबईला दिली आहे. ही महत्त्वाची संस्था मुंबईत असल्याने या क्षेत्रात मुंबई जगाच्या एक पाऊल पुढे असणार आहे. करमणूक क्षेत्राची मुंबई ही जगाची राजधानी असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयआयसीटीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गोंदिया बल्लारशाह या रेल्वे मार्गिकाचे दुहेरीकरण करण्यासाठी ४,८१९ कोटी रूपये केंद्र शासनाने दिले आहे. या दुहेरीकरण प्रकल्पामुळे विदर्भाचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश राज्यांबरोबर व्यापार-व्यवहार वाढणार आहे. तसेच राज्यात सर्व प्रकारच्या प्रवासासाठी एक कार्ड प्रणाली लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000
संजय ओरके/विसंअ/