मुंबई, दि. 23 : जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गे मुंबईला पाठविण्यात येत असून दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क करण्यात आला असून ते सुखरूप असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जम्मू व काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचेही राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
००००