महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित केला आहे त्यानिमित्त…
बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप बदल स्वीकारत काम करणे आवश्यक असते. हे काम त्या काळाला अनुरूप असेल तर ते अधिक गतीमान होते. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीय कामामध्ये कुशलता वाढवून कामांची गुणवत्ता वाढवणे, समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासणे, कमी कालावधीत अधिक अचूक काम करणे व लोकाभिमुख असणे ही काळाची गरज आहे.
आज काळानुरूप तंत्रज्ञानात आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत झपाट्याने बदल होत आहे. हे लक्षात घेता प्रशासकीय अधिकारी यांना या प्रशिक्षणातून गतीमानतेने प्रशासकीय कामकाज व्हावे,काम करत असताना येणाऱ्या ताण – तणावाचे व्यवस्थापन याबाबींचे मार्गदर्शन मिळत राहणे गरजेचे आहे यातून तणावरहित कार्यपद्धती आत्मसात करणे शक्य होते त्यातून कामाप्रती असलेली बांधिलकी जपली जाते आणि लोकसेवेच्या व्यापक भावनेतून ,प्रशासकीय कामकाजात अधिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन वेळोवेळी अनेक उपक्रम राबवत असते. हेच लक्षात घेवून केंद्र शासनाच्या Integrated Government online Training (iGOT) प्रणालीवर उपलब्ध असलेले प्रशिक्षण राज्यातील अधिकारी यांनी घ्यावेत यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना सूचना केल्या आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. महाराष्ट्र शासन आयोजित आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असलेली टेक वारी म्हणजे पहिली डिजिटल वारी असून टेक वारी ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. –अपर मुख्य सचिव व्ही. राधा, सामान्य प्रशासन विभाग. |
‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण आणि परिषद सभागृह सातवा मजला येथे विविध व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार असून निवड झालेल्या कल्पनांना १५ लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे.
‘टेक वारी’ म्हणजे काय तर (TECH-WARI) म्हणजे (Wisdom through wellness and Work-life Balance) निरोगीपणा आणि जीवनातील कामकाज संतुलन,(Awareness of Emerging technologies) उदयोन्मुख तंत्रज्ञानाची माहिती व जनजागृती,(Reform in Governance Practices) प्रशासनाच्या कामकाजात अधिक गतीमानता आणणे,(Informed and Inclusive Workforce) जाणकार आणि समावेशक कुशल अधिकारी व कर्मचारी यासाठी प्रयत्न करणे यासाठी टेक वारी असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे.
आय गॉट प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाच्या आय गॉट (iGOT) प्रणालीवर विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणे उपलब्ध आहेत. हे प्रशिक्षण मिशन कर्मयोगी अंतर्गत विकसित केलेले आहे,जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आहे. आय गॉट मध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. आय गॉट मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते, जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाला जोडले जाणार आहे. १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत सामान्य प्रशासन विभागाने केंद्र शासनाच्या आय गॉट प्रणालीवर तीन महिन्यात राज्यात ९ हजारावरून ५ लाख कर्मचाऱ्याची नोंदणी केली आहे. आय गॉट प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टेक वारी असेल अथवा आय गॉट प्रणाली शासनातील अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या व्यस्त दिनचर्येतून स्वयंविकासासाठी असलेले हे व्यासपीठ शासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक विकासासोबतच त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होतील. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आय गॉट वर जरूर प्रशिक्षण घ्यावेच सोबत टेक वारीतही सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.
००००
– संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय