सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहावे – प्रसाद देवरे

Oplus_131072

मुंबई, दि. ७ : डिजिटल युग अधिक प्रगत होत आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग राहावे, असे आवाहन नॅस्कॉमचे अधिकारी प्रसाद देवरे यांनी सांगितले.

‘टेक-वारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘सायबर सुरक्षा’ विषयावर प्रसाद देवरे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री.देवरे म्हणाले, डीप फेक व्हिडीओ, डेटा चोरी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा. सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा तसेच दुहेरी प्रमाणीकरण प्रणाली वापरा. अनोळखी व्यक्तींचे ई-मेल, मेसेजमधील लिंक्स उघडू नका. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि ‘आयओटी’ डिव्हायसेसचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा. सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्या. बँकिंग किंवा खरेदीसाठी फक्त बँक किंवा अधिकृत प्रदात्यांचे ॲप्स वापरा.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे कोणताही संशयास्पद मजकूर किंवा संदेश फॉरवर्ड करताना प्रत्येकाने अत्यंत सतर्क राहावे. सायबर सुरक्षेसाठी काळजी घेणे ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

00000

शैलजा पाटील/वि.संअ