गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक – पालकमंत्री नितेश राणे

• दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द
• दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
• सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविणार

सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या  जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. राज्य स्तरावरील मोहिमेमध्ये क्रमांक पटकाविलेल्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला आणि त्यांच्या  पाठीवर थाप मारली. आणि मी तेव्हाच ठरविले होते, की या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले असेल त्यांचा मी जिल्हावासियांच्या वतीने आभार मानणार आणि त्यांचा सत्कार करणार. तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुमच्या मागे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमी उभा आहे. जनतेचे सेवक म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना सेवा द्या. चांगले काम करणाऱ्यांना मी नेहमीच शाबासकी देणार.

आज तुम्ही चांगलं काम कराल, तर आम्ही जिल्हावासीय तुमच्या सोबत सदैव आहोत असेही ते म्हणाले. जनतेच्या हिताचे निर्णय घ्या, विविध क्षेत्रात नव नवीन प्रयोग करा, जगामध्ये तसेच देशामध्ये जे चांगलं आहे ते तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणा. तुम्ही अशाच पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून चांगले काम करत जा, काहीतरी नवीन घडवा, काहीतरी नवीन प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याला पुढे घेऊन जा.  150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळावे ही माझी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षामध्ये जिल्ह्याला पुढे घेऊन जायचे आहे. यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. म्हणून खासदार राणे साहेबांनी देखील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.   जिल्ह्यातील शाळांचा स्तर उंचवला पाहिजे, त्यातून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.  कोकणातल्या संपूर्ण निकालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.  तसेच जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षणासाठी चांगले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखणे, जिल्ह्याची प्रतिमा सुधारणे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही फार बारकाईने लक्ष देत आहोत. आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे तो त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणांचा सत्कार झालेला आहे. तुम्ही दहावी-बारावी मध्ये एवढे चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे तुम्ही पुढेही अशाच चिकाटीने अभ्यास करत राहा. मी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना विश्वास देतो की तुमच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची दालने आम्ही निश्चितपणे उघडे करू. त्या दिशेने आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.

इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील. कु.आर्या अजित राणे आणि कु. श्रेयश चंद्रशेखर बर्वे आणि  कुडाळ हायस्कूल मधील कु.चैतन्या रुपेश सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश विनोद कडुलकर, रेश्मा पालव, विधी विरेंद्र चिंदरकर,  ध्रुव आनंद तेंडुलकर,  हर्षदा किसन हडलगेकर  या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा राजेंद्र काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली शासकीय कार्यालये-
१. उपविभागीय कार्यालय, कणकवली, (३ रा क्रमांक)
२. तहसिलदार कार्यालय, कणकवली (२ रा क्रमांक)
३. गट विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (३ रा क्रमांक)
४. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला (३ रा क्रमांक)
५. पोलिस निरीक्षक, मालवण (३ रा क्रमांक)
६. उप अभियंता कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , देवगड (३ रा क्रमांक)
७. सहायक पशुसंवर्धन कार्यालय, (२ रा क्रमांक)
८. पशुधन विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (प्रथम क्रमांक)
९. मख्याधिकारी कार्यालय, वेंगर्ला (३ रा क्रमांक)
१०. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, सावंतवाडी (२ रा क्रमांक)

000000