जिगाव प्रकल्प पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा प्राधान्याने द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील 

मुंबई, दि. ५ : सिंचन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांप्रती शासन संवेदनशील आहे. पुनर्वसित गावठाणमध्ये आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिगाव सिंचन प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावठाणांमध्ये तातडीने आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

खडकपूर्णा व जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात मंत्री श्री. जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. या बैठकीस आमदार मनोज कायंदे यांच्यासह  पुनर्वसन व जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्त नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यास शासन कटिबद्ध आहे. या सुविधा देण्यासाठी  सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. या प्रकल्पातील २२६ भूधारकांना १० कोटी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित भूधारकांना तातडीने सानुग्रह अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री श्री. जाधव पाटील यांनी दिल्या.

पुनर्वसित गावांमध्ये समाजमंदिर, ग्रामपंचायत, सभागृह, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणसह  अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण अशा आवश्यक मूलभूत नागरी सुविधा  उपलब्ध करून देण्यात याव्यात. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्वसन, जलसंपदा, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभाग या विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. याबाबत सुविधांनुसार आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. जावध पाटील यांनी दिल्या.

जिगाव सिंचन प्रकल्प शेतीच्या सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे  या भागातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्राधान्य द्यावे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील खडकपूर्ण प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावात देण्यात आलेल्या नागरी सुविधांची नियमित देखभाल दुरुस्ती करावी. या नागरी सुविधांची पाहणी करून सुविधांच्या दुरुस्तीबाबतचा गावनिहाय व कामनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी दिले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/