कोकण वसाहत व शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा रखडलेला पुनर्विकास पूर्ण करावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. 10 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पश्चिम) भागातील एलआयजी -1 कोकण वसाहत आणि मौजे चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था येथील रखडलेला पुनर्विकास रखडलेला असल्याच्या तक्रारी आहेत. विकासकाने पुनर्विकास करून नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून द्यावी. विकासकाकडून होत असलेला विलंब बघता म्हाडाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

मंत्रालयात एल.आय.जी 1 कोकण वसाहत व मौजे चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबत बैठकीचे आयोजन राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीस आमदार नरेंद्र पवार, उपसचिव अजित कवळे, कोकण मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गायकर, उपनिबंधक अभिजीत देशपांडे, मुख्य अभियंता शिवकुमार आडे आदींसह याभागातील नागरिक उपस्थित होते.

परिसरातून आलेल्या नागरिकांनी प्रकल्पाबाबत तक्रारी केल्या. यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत प्रश्नावर नियमानुसार तोडगा काढण्याबाबत यंत्रणेला सूचित केले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/