मुंबई, दि. ११ : भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकता, व्यापकता आणि विविधतेचा जागतिक स्तरावर गौरव करत, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल स्वीडनमध्ये झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्टोरल इंटिग्रिटी मध्ये प्रमुख भाषण केले. या परिषदेत त्यांनी भारतातील निवडणूक व्यवस्थापनाची भूमिका, पारदर्शकता व जागतिक पातळीवरील निवडणूक संस्थांसाठी भारताच्या योगदानावर प्रकाश टाकला.
भारताची निवडणूक प्रक्रिया : एक अद्वितीय महाकाय उपक्रम
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, भारतात निवडणुका केवळ निवडणूक आयोगापुरती मर्यादित नसून त्यात राजकीय पक्ष, उमेदवार, सामान्य व विशेष निरीक्षक, पोलिस यंत्रणा आणि माध्यम प्रतिनिधी अशा अनेक घटकांची सक्रिय व पारदर्शक भूमिका असते. या सर्वांचा समन्वय साधत सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने निवडणूक आयोग एक विशाल संस्था म्हणून कार्य करते, जी अनेक देशांच्या सरकारांपेक्षा आणि जागतिक कंपन्यांपेक्षा अधिक व्यापक आहे.
इतिहास, प्रगती आणि समावेशकता
१९५१-५२ मध्ये १७.३ कोटी मतदारांपासून सुरू झालेला भारताचा निवडणूक प्रवास २०२४ मध्ये ९७.९ कोटी मतदारांपर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीच्या दोन लाख मतदान केंद्रांपासून आता ही संख्या १०.५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७४३ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये सहा राष्ट्रीय पक्ष, ६७ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर नोंदणीकृत पक्षांचा समावेश होता. एकूण २०,२७१ उमेदवारांनी ६.२ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे देशभर निवडणुका लढवल्या.
मतदार यादीतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नमूद केले की, १९६० पासून आजपर्यंत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दरवर्षी मतदार यादीचा पुरवठा केला जातो. यात दावे, हरकती आणि अपील्सची व्यवस्थाही आहे. ही प्रक्रिया भारतातील निवडणूक प्रणालीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अधोरेखित करते.
कोणताही मतदार मागे नको — भारतीय संविधानाचा मूलमंत्र
प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे, हे दाखवत ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की पहिल्यांदा मतदान करणारे, ८५ वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी नागरिक आणि अतिदुर्गम भागातील मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. हिमाचल प्रदेशातील ताशिगंगसारख्या उंचावरील मतदान केंद्रापासून एकाच मतदारासाठी उभारलेल्या बूथपर्यंत, “कोणताही मतदार मागे राहू नये” हे भारतीय निवडणूक आयोगाचे ब्रीद आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संवाद
परिषदेच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मेक्सिको, इंडोनेशिया, मंगोलिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, मोल्दोवा, लिथुआनिया, मॉरिशस, जर्मनी, क्रोएशिया, युक्रेन आणि युनायटेड किंगडममधील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. यामध्ये मतदार सहभाग, निवडणूक तंत्रज्ञान, प्रवासी भारतीयांचे मतदान आणि संस्था क्षमतावृद्धी यावर चर्चा झाली.
भारताची निवडणूक प्रणाली ही केवळ जगातील सर्वात मोठी नाही, तर सर्वात विश्वासार्ह व समावेशक आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
000