सातारा दि.11 (जिमाका ) : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे . शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या कलेसमोरील आव्हानांची चर्चा होण्याच्या दृष्टीने शाहिरी महोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे ठरतात. ही कला जगभरात आणि जगासमोर मांडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केले.
सातारा येथे 9 ते 11 जून या कालावधीत शाहू कला मंदिरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे (दादा) महाराज भोसले रंगमंचावर झालेल्या शाहिरी महोत्सवाचा सांगता समांरभ सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहसंचालक निलेश धुमाळ, मराठी साहित्य कार्यवाहक शिरीष चिटणीस, प्रतापगड संवर्धन समितीचे सदस्य पंकज चव्हाण, विक्रम पावस्कर यांच्यासह विविध पदाधिकारी, सन्मानिय शाहिर यांची उपस्थिती होती.
सातारची माती देव, देश आणि धर्मासाठी त्यागाची प्रचंड मोठी परंपरा असणारी माती आहे. हा जिल्हा साहित्य, कला आणि संस्कृतिचाही वारसा जपणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने स्वकीयांसाठी स्वधर्मासाठी, स्व भाषेसाठी लढण्याची वृत्ती दिली. त्यामुळेच शाहिरी महाेत्सवाच्या आयोजनासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली, असे सांगून ॲङ शेलार म्हणाले, जो समाज आपली संस्कृती, वारसा, परंपरा जपतो तोच समाज पुढे जातो. आक्रमणे ही केवळ भूभागावर होत नसतात तर इंटरनेट सारख्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरांवरही हल्ला होत असतो. अशा काळात आपला दैदिप्यमान वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या संपन्न परंपरांचे जनत, संवर्धन, प्रचार व प्रसार याबाबी महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीने विरासत ते विकास तक हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा विभाग कार्य करतो आहे.
ॲङ शेलार यांनी आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृति, लोक नाट्य, लोक वाद्य याबद्दल जनजागृतीकरण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देवून चर्चा घडवून आणण्यासाठी पुढील मार्च पर्यंत 1 हजार 200 कार्यक्रम घेण्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या कार्यक्रमांमध्ये, चर्चा, परिसवांद, स्पर्धा आणि लोकसहभाग यांचा समावेश असेल असे स्पष्ट केले. शाहिरी परंपरा ही सामाजिक प्रबोधनाला, सामाजिक चळवळीला उभारी देणारी परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हेर खाते, बहिर्जी नाईक यांनी या कलेला आत्मसात करुन शत्रू गोटातील बातमी महाराजांना व आपल्या सैन्याला दिली. स्वातंत्र्य काळात शाहिरी परंपरेने लोकजागृती, लोक शिक्षण याद्वारे लोकचेतना जागविल्या. राष्ट्रनिर्मितीमध्ये या शाहिरी परंपरेने मोलाचे योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख अशा सगळ्या शाहिरी परंपरेतल्या मंडळींनी आपले जीवन तळहातावर घेऊन पेटविलेला अंगार विसारता येणार नाही. म्हणूनच शाहिर साबळे यांनी गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र गीतचा दर्जा मिळाला. या केलेचे जतन संवर्धन करुन ही कला जगात व जगासमोर मांडण्यासाठी सर्वातोपरी पर्यंत केले जातील, असेही सांस्कृतिक मंत्री ॲङ शेलार यांनी सांगितले.
आमदार श्री. घोरपडे यांनी लोक कला जपल्या पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्र शासन लोक कलांना राजाश्रय देण्याचे काम अशा महोत्सवांमधून करत असल्याचे सांगून डिजीटल युगाच्या क्रांतीमध्ये या कला जीवंत राहिल्या पाहिजेत यासाठी हा विभाग कार्यकरीत असल्याचे सांगितले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या कामाचे कौतुक करुन सातारा जिल्ह्याचा विकास भरुन निघेल असा विश्वासही व्यक्त केला.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शाहिर महोत्सव सातारा येथे आयोजित करुन या जीवंत शाहिरी कलेची अनुभती खऱ्या अर्थाने कदरदान असणाऱ्या सातारा वासियांना दिली. या बद्दल विभागाचे आभार मानले. ही कला पुढची पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी, असे महोत्सव ही मोठी संधी ठरते, असे सांगून जिल्ह्याचा विकास हा भौतिक अंगानेच नव्हे तर सांस्कृतिक अंगानेही झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शाहिरी, गोंधळी, करपल्लवी या सारख्या कला जीवंत ठेवल्याबद्दल कलाकारांचेही आभार मानले.
यावेळी श्री. चिटणीस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.