छत्रपती संभाजीनगर, दि.13, :- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज जायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुदधीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल, ॲप्रोच ब्रिज, फिल्टर प्लॅंट आदीसह सुरू असलेल्या कामाची पाहणी करून प्रत्येक कामाला काम पूर्ण करण्याबाबत विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विहित कालावधीत कामे पूर्ण करा,असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.
पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार श्री.देशमुख यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री पापळकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणे, 26 एमएलडीचा टप्पा जूनअखेर पूर्ण करणे, यासह कंत्राटदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेच्या सबंधित यंत्रणेने आपसात समन्वय ठेवत विहित कालमर्यादेत काम पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. महापालिका व कंपनीतर्फे करण्यात येणारी उपाययोजना याबाबत त्यांनी माहिती घेतली.
विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, २४ ठिकाणच्या जोडण्या पूर्ण करणे, ३० टाक्याचे बांधकाम आणि वितरण व्यवस्था जोडणीचे काम मागे पडले आहे ते काम कंत्राटदाराने पूर्ण करण्याबाबत विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी सूचना दिल्या.
जायकवाडी धरणक्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील २६ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही जाणून घेतल्या.
मा.उच्च न्यायालयात पाणी पुरवठा योजनेबाबत जनहित याचिका सुरू असून प्रशासनाकडून मा.उच्च न्यायालयाला वेळेवेळी पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा दिला जातो. 11 जून रोजी याबाबतचा आढावा देण्यात आला. मुख्यमंत्री महोदय यांनीही मुंबई येथे नुकतीच पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक घेतली असून या बैठकीत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करा असे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*****