मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला बाजार समितीतील ७.५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

नाशिक, दि. २३ :  राज्याचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए.आय. यंत्रणा विकसित करावी. त्यातून शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल. त्यातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर कांदा निर्जलीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज येवला बाजार समिती व अंदरसूल उपबाजार समितीतील ७.५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी अंदरसूल उपबाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारुतीराव पवार, उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, सचिव के. आर. व्यापारे, संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक वसंत पवार, रतन बोरनारे, संजय बनकर, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, सरपंच लताताई जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार अंदरसूल समितीचे सदस्य, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, येवला लासलगावसह परिसरात कांदा उत्पादक शेतकरी अधिक असल्याने चिचोंडी औद्योगिक वसाहतीत 50 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जागेची निवड देखील करण्यात आलेली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर उपलब्ध होणार आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डोंगरगाव उपबाजारासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच या उपबाजारासाठी शासनाकडून जागा उपलब्ध होईल. तालुक्यातील 1700 हून अधिक शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या शेतकऱ्यांना ही मदत लवकरच प्राप्त होईल. येवला बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक दशकांपासून कार्यरत असून पारदर्शक व्यवहार,शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामकाज व वेळोवेळी सुधारणा या धोरणांवर कार्य करत आहे.आज आपण जे बाजार समितीचा चेहरा पाहत आहोत,तो मागील काही वर्षांतील नियोजनबद्ध विकासाचा परिणाम आहे. आपल्या येवला बाजार समितीत गेल्या काही वर्षांत महत्त्वाची पायाभूत कामे झाली आहेत.बाजार समिती ही सहकार तत्वावर चालणारी एक संस्था आहे. येवला बाजार समितीचा हा विकास म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी प्रक्रिया आहे. आगामी काळात येवला बाजार समितीच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया उद्योग, रेशीम बाजार पेठ व कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.येवला बाजार समितीचा विकास अधिक व्यापक, सुसंवादी आणि शाश्वत करणे, ही आपली सर्वोच्च प्राधान्यक्रमातली जबाबदारी असणार असल्याचे मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला मुख्य आवार येवला जनावरे शेड जवळ व प्रवेशद्वारातील रस्ता ट्रिमिक्स काॅंक्रीटीकरण करणे तसेच प्रवेशद्वार दुरुस्ती करणे
मुख्य आवारातील कार्यालयाचे व उपहारगृहाचे नुतनीकरण व बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन, (र.रु. ११२ लक्ष)
मुख्य आवारातील सेलहॉलचे उद्घाटन करणे (र.रु.१७७ लक्ष)
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदरसुल येथील कॉटन मार्केट आवारातील जागा ट्रिमिक्स कॉक्रीटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २०५ लक्ष)
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदरसुल येथील जुन्या आवारात सेलहॉलचे बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. १२१ लक्ष)
येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील तलाठी कार्यालयाचे लोकार्पण
मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील रुपये 30 लक्ष निधीतून साकारलेल्या तलाठी कार्यालयाचे लोकार्पण झाले. यावेळी उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, सरपंच रुपाली देशमुख, उप सरपंच कडू झाल्टे , 38 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.