शेतकऱ्यांना आठ दिवसात आक्षेप नोंदवण्याच्या दिल्या सूचना; रेल्वेच्या विविध कामांसाठी भूसंपादनाचे प्रकरण
नागपूर, दि. 24 : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील चार गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावावा आणि संबंधित शेतकऱ्यांनी आठ दिवसाच्या आत लवादाकडे आक्षेप नोंदवावे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नुकसान होणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आज येथे दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज श्री. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामाच्या भूसंपादनाबाबत बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामासाठी दहेगाव, नायगाव, चरूरखटी आणि निमसडा येथील शेतकऱ्यांची 27.24065 हेक्टर आर जमीन भूसंपादित करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी योग्य मुल्यांकन मिळाले नसल्याची तक्रार आहे. याप्रकारणाबाबत श्री.अहीर यांनी शासन आणि शेतकऱ्यांचे मत समजून घेतले व आवश्यक माहिती यावेळी जाणून घेतली.
याप्रकरणात शासनाने नेमलेल्या लवादाने सखोल बाबींचा विचार करून निर्णय द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे हरकती व नोंदी सादर कराव्या, अशा सूचना श्री. अहीर यांनी दिल्या. तसेच याभागात भूसंपादन होवून सुरू असलेले रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅकचे बांधकाम सद्या शेतीची पेरणी लक्षात घेता शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून पार पाडावी,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.