‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी

आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम

मुंबई, दि. २४ :- पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’. हा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

‘चित्ररथ’ जनजागृतीचे प्रभावी माध्यम

वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, पथनाट्य पथक, माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल व्हॅन आणि सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. “संकटाला घाबरू नका, सज्ज राहा” असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दि. १९ जून पासून वारीबरोबर प्रारंभ झालेल्या या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झाली आहे. दि. ६ जुलै, आषाढी एकादशीपर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे.

चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रे, वारकरी परंपरेचे दर्शन, तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे.

वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वारीत संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन प्रमुख पालख्यांच्या मागोमाग गावागावातील लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत असतात. ही संपूर्ण वारी जिथे भक्तिभाव, कीर्तन, रिंगण, अभंग गजरात रंगलेली असते, तिथेच ही “दिंडी सजगतेची आपत्ती व्यवस्थापनाची” माहिती घेऊन आपले कार्य करत आहे. वारकऱ्यांनी या चित्ररथांचे आणि माहिती स्टॉल्सचे स्वागत केले असून, “सजग व सुरक्षित वारी” ही संकल्पना सर्वांच्या मनात घर करत आहे.  शासनाचा हा स्तुत्य उपक्रम उपक्रम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेच्या सहभागाचा उत्कृष्ट संगम आहे. लाखो वारकऱ्यांचे या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रबोधन होत आहे.

सामाजिक बांधिलकीचा आदर्श

या उपक्रमातून केवळ आपत्ती व्यवस्थापनाची माहितीच नव्हे तर – संकट काळात कसे वागावे, आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवावा, कोणती खबरदारी घ्यावी” यासंबंधी देखील प्रबोधन करण्यात येत आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/