मुंबई, दि. 25 : जलसंधारण विभागाच्या पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोताजवळील भूजल पुनर्भरणाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे. जेणेकरून, नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत पाणीपुरवठासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव डॉ. बापू पवार, राज्य पाणी व स्वच्छता अभियानाचे अभियान संचालक ई.रवींद्रन, नागपूरचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, मुख्य अभियंता प्रशांत भामरे उपस्थित होते.
या बैठकीत नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सुचनेनुसार विभागीय पातळीवरील अडचणी, स्रोतांचा दर्जा आणि भविष्यातील गरजा यावर सखोल चर्चा झाली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सक्षम करण्यावर भर द्यावा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून घरोघरी पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रगतीपथावरील योजनांची कामे पूर्ण करण्यास आवश्यक निधी लवकरात लवकर उपलब्ध करून घेवून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भूजल पातळी वाढवण्यासाठी भूजल सर्वेक्षण विकास विभागाने भूजल पुनर्भरण योजना तयार करून त्याबाबतचे धोरण निश्चित करावे. नागपूर जिल्ह्यातील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेकरिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, कामठी छावणी परिषद यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
नागपूर पेरी अर्बन (12 गांवे) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे दर जास्त असल्याने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधित नगर पंचायत, ग्राम पंचायतीला पाण्याच्या उंच टाकीपर्यंत ठोक तत्वावर पाणी पुरवठा करणे व नगर पंचायत, ग्राम पंचायतीने पुढील वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीसह पाण्याची देयके, त्याची वसुली थेट ग्राहकाकडून करणे याबाबतही चर्चा करण्यात आली.
0000
मोहिनी राणे/ससं/