सातारा दि.25 : आपल्या घरादरांवर तुळशीपत्र ठेवून संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांच्या रक्षणासाठी ज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा भोगल्या सोसल्या प्रसंगी तरुंगवास भोगला अशांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत. यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेली भारतातील लोकशाही आणि आणबाणीच्या कालखंडातील विविध घटनाक्रम यांचा मागोवा असणारे प्रदर्शन छत्रपती शाहुकला मंदिर नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. लोकांच्या मुलभूत अधिकारांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने लादली गेली होती. ही लोकशाहीची हत्या होती. या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने आणीबाणीच्या काळात झालेला संघर्ष. अनेकांनी सोसलेल्या यातना आणि लोकशाहीचा दैदिप्यमान वारसा या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने छत्रपती शाहुकला मंदिर नाट्यगृहा सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते झाले. जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह आणीबाणीत सहभागी नागरिक, महिला उपस्थित होते.
यावेळी ज्यांनी आणीबाणीच्या काळात तुरंगवास भोगला, लोकाशाहीच्या जपणुकीसाठी संघर्ष केला अशा योद्धयांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेली सन्मान पत्र प्रदान करुन पालकमंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. संघर्ष योद्ध्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यासपिठावरुन खाली उतरुन आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचा सन्मानपत्र व गुलाबपुष्पह देऊन सन्मान केला.
लोकशाहीमध्ये नागरिकांच्या मतांना अभूतपूर्व महत्व आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करुन अष्टप्रधानमंडळाची निर्मिती केली. त्याही पूर्वी प्राचिन ऋषीमुनींच्या काळात,
बौद्धकाळात लोकांचा सहभाग घेऊन लोकप्रतिनिधींमार्फत कारभार चालविण्याची भारताची परंपरा अत्यंत पुरातन आहे. असा लोकशाहीचा दैदिप्यमान वारसा असणाऱ्या भारतात 1975 साली आणीबाणी लागली. या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने लावण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये त्याचे प्रतिबींब दिसत आहे. आणीबाणीमुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणली गेली. याच्या विरोधात लढा देणाऱ्यांचा शासनाने आदर व सन्मान केला आहे. त्यांना मानधनही सुरु केले आहे. जे संघर्ष योद्धे अथवा त्यांचे कुटुंबीय या मानधानापासून वंचित आहेत अशांचा शोध घेऊन त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आणबाणीच्या काळातील बंदीजन श्री. निकम यांनी तो काळ सामान्य माणसांनी दिलेला लढा व केलेला संघर्ष यांच्या आठवणी जागाविल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास आणीबाणीतील संघर्ष योद्धे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह महसूल विभागातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
0000