शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडते, कधी पूर येतो, तर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवाय, विजेचा शॉक, रस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि अडचणी येतात. अशा अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे.
*योजनेची उद्दिष्ट्ये:
* अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.
* शेती व्यवसायातील धोके कमी करणे.
* शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे.
* या योजनेत राज्यातील वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी) पात्र आहेत.
* अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्षे असावे.
* अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळते.
* एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.
* अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
*आवश्यक कागदपत्रे:*
* 7/1 उतारा
* मृत्यूचा दाखला (अपघाती मृत्यू झाल्यास)
* तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
* शेतकऱ्याच्या वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र)
* प्रथम माहिती अहवाल (FIR)
* स्थळ पंचनामा
* पोलिस पाटील माहिती अहवाल
* अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे
*अपघात –
या योजनेत रस्ता अपघात, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल आणि अन्य कोणत्याही अपघातांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
–जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर.