पालकमंत्र्यांच्या हस्ते १२ भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप

अमरावती, दि. २७ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ भूमिहीन लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शेतजमिनीच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले.

शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी स्वतः शेतजमीन पट्टे व आदेशाचे वितरण केले. आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, प्रवीण पोटे-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी  गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यावेळी उपस्थित होते.

मोर्शी तालुक्यातील मौजा शिरलस येथील श्रीमती शिला वानखडे, अशोक वानखडे, बाळु खडसे व मौजा नेरपिंगळाई भाग 2 येथील अमोल डाखोडे यांची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी निवड करण्यात आली. तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा माहुली चोर येथील माला इंगोले,  रेखा कांबळे, मौजा येवती येथील जितेंद्र घोडेस्वार, शिवानंद मेश्राम, संजय चिमणकर, रमेश मुनेश्वर, मंगेश लोखंडे व अमर बनसोड यांचीही कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी निवड करण्यात आली.

लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 18 ते 60 वयोगटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील पिढ्यानपिढ्या भूमिहीन असलेल्या शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, त्यांचे राहणीमान उंचावणे आणि मजुरीवरील त्यांचे अवलंबित्व कमी करून त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळवून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत अशा भूमिहीन शेतमजूरांना त्यांची शेतमालक होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन कसण्याकरिता उपलब्ध करून दिल्या जाते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2025-26 या वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवशाली अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत समाजातील वंचित, दुर्बल घटकांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असलेल्या  लाभार्थ्यांना शेतजमीन पट्टे व आदेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.

या योजनेअंतर्गत शेतमालक म्हणून निवड झालेल्या भूमिहीन लाभार्थी, तसेच विधवा व परित्यक्ता महिलांशी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी संवाद साधला.

00000