आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 29 :-  आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राज्यातील विविध यंत्रणांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतानुसार तातडीने कामे होणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, तातडीने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून मंजूर कामांना गती द्यावी.

शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी विहित कालावधीत खर्च होईल यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून अंमलबजावणी करावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ग्रामीण भागामध्ये पुरवण्यात आलेल्या साधनसामग्रीचा उपयोग करून घेण्यासाठी ग्रामस्तरावर ग्रामजागृती व साहित्य वापरासाठी  जागृती होणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत त्यांना प्रशिक्षण द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण, वित्त विभागाचे सह सचिव विवेक दहिफळे, जलसंपदा विभागाचे सह सचिव रा.अ. काटपल्लीवार, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव वी. म. देवराज, महावितरणचे कार्यकारी संचालक द. वी. पडळकर, खार भूमी विभागाचे कार्यकारी अभियंता वी.पा.पाटील, वित्तीय सल्लागार व सहसचिव अरुण कोल्हे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव द. ह. कदम, आपत्ती व्यवस्थापनाचे अवर सचिव रतनसिंह परदेशी, राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, नगरविकास विभागाच्या नम्रता मुंदडा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विविध यंत्रणांचे क्षेत्रीय कार्यालय प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/