‘मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड’या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणार

आयटीआयमध्ये तांत्रिक शिक्षणासोबत व्यक्तीमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ मध्ये “मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड”योजना राबविण्यात येणार आहे.विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची शासनाकडे नोंद आहे. या सर्वांना ईमेल करून त्यांची एआयद्वारे परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये पाच लाख युवक-युवतींची विविध पद्धतीद्वारे निवड करण्यात येईल. यातून पुन्हा चाळणी करून १ लाख उमेदवारांची मूल्यांकन चाचण्या,स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून निवड केली जाईल. अंतिम टप्प्यात २५,००० निवडक उमेदवारांना त्यानंतर तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक, स्टार्टअप्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत इतर अनुषंगिक व्यक्तीमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता नाविन्यता विकास विभागाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, “महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५”ला मान्यता देण्यात आली असून या धोरणाची अधिकृत अंमलबजावणी  करण्यात येणार आहे. हे धोरण महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविले जाणार आहे. या धोरणाद्वारे महाराष्ट्रात भारतातील सर्वात गतिशील व भविष्यवेधी स्टार्टअप केंद्र उभारण्याचा उद्देश आहे.या धोरणात पुढील पाच वर्षांसाठी महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडण्यात आला असून १.२५ लाख उद्योजक घडवणे व ५०,००० स्टार्टअपना मान्यता देण्याचे उद्दिष्ट आहे. शहरी, ग्रामीण, महिला आणि युवा उद्योजकांसह सर्व क्षेत्रांतील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि वंचित समुदायांवर लक्ष केंद्रित केले जाईल.या धोरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निवडलेल्या उमेदवारांना वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून रु.५.०० लक्ष ते रु.१०.०० लक्ष पर्यंत कर्ज साहाय्य दिले जाईल. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी (corpus) उभारला जाईल. महाराष्ट्र स्टार्टअप वीक अंतर्गत निवड झालेल्या स्टार्टअप्सना राज्यशासन विभागांसोबत थेट काम करण्याची संधी मिळेल आणि रुपये २५ लाखांपर्यंतचे प्रायोगिक तत्वावर कार्यादेश दिले जातील. राज्यातील प्रत्येक विभाग आपल्या वार्षिक तरतुदीपैकी ०.५% निधी नाविन्यता व उद्योजकतेसाठी  उपलब्ध करेल. यामधील सर्व योजना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यासहाय्याने राबवण्यात येतील, जी राज्यातील नाविन्यता व उद्योजकता क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे’ आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात, मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार आहे.

पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडी, खो-खो, लगोरी, लेझीम, रस्सीखेच,मल्लखांब, पावनखिंड दौड, कुस्ती,पंजा लढवणे, विटी-दांडू,दोरीच्या उड्या, फुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.  कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात ही जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे.

आयटीआयमध्ये २० नवीन शॉट टर्मचे अभ्यासक्रम  १५ सप्टेंबर पासून सुरू होणार

मंत्री श्री.लोढा म्हणाले की,आयटीआय मध्ये २० नवीन शॉर्ट टर्म कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत इतर अनुषंगिक व्यक्तीमत्व विकासाचे अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत.ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्यासाठी अधिकचे कौशल्य प्राप्त होतील. आयटीआय मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील बिझनेस अ‍ॅनालिटिक्स (चार महिने), मार्केटिंग मॅनेजमेंट (तीन महिने),प्रॉडक्शन मॅनेजमेंट (साडे तीन महिने),फायनान्शियल मॅनेजमेंट (तीन महिने), बिहेव्हियरल मॅनेजमेंट (साडे तीन महिने)हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.सॉफ्ट स्किल्स मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड कम्युनिकेटिव इंग्लिश अ‍ॅण्ड प्रोफेशनल स्किल्स ट्रेनर (तीन महिने),फंडामेंटल्स ऑफ कॉन्टेन्ट रायटिंग (तीन महिने),कम्युनिकेटिव इंग्लिश ट्रेनर (तीन महिने),पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रूमिंग (साडे तीन महिने), कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM) (तीन महिने)हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रम अ‍ॅडव्हान्स्ड कोर्सेस इन गार्डनिंग (साडे तीन महिने), इलेक्ट्रिशियन अ‍ॅण्ड प्लम्बिंग (तीन महिने),नर्सिंग (तीन महिने),फ्रंट डेस्क कोऑर्डिनेटर  (तीन महिने),हाउसकीपिंग सुपरवायझर (साडे तीन महिने)हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.काळानुरूप विशेष अभ्यासक्रमामध्ये एआयमशीन लर्निंग डेव्हलपरचा (तीन महिने),सोलर पॅनल इन्स्टॉलेशन अ‍ॅण्ड मेंटेनन्स साडे (तीन महिने),ड्रोन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ऑपरेशन्स (तीन महिने),ईव्ही मेकॅनिक (साडे तीन महिने),इंडस्ट्रियल रोबोटिक्स अ‍ॅण्ड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन (चार महिने)हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.स्थानिकांच्या मागणीनुसार अन्य पाच अभ्यासक्रमही संबंधित आयटीआयना निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.अर्बन सिटी एरियाज- को-ऑप. हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कोर्स,कोस्टल रिजन – फिश प्रोसेसिंग,ऑर्नामेंटल फिशरीज,अ‍ॅग्रिकल्चरल बेल्ट -अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग टेक्निशियन  हे देखील अभ्यासक्रम सुरू  करता येतील, अशी माहिती देण्यात आली.

०००००

संध्या गरवारे/विसंअ