अवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
11

पुणे, दि.13 : अवयवदान ही या देशाची जुनी संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात या दातृत्वाचे महत्त्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्त्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अवयवदान संस्कृतीला पुनरुज्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ.महेश अबाळे, डॉ.विलास उगले, अधिष्ठाता डॉ.संजीव सोनावणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ.पराग काळकर यांच्यासह डॉ.श्रीमती अंजली कुरणे, अधिसभा सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका वैष्णवी पाटोळे हिला अवयवदान संकल्पाचे प्रमाणपत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रदान करण्यात आले. विद्यापीठ क्षेत्रातील सर्व स्वयंसेवकांची प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या वैष्णवी पाटोळे यांच्यासह कोविड संकटकाळात सर्व विद्यार्थ्यांनी उभारलेल्या मदत व सेवा कार्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विशेष कौतुक केले.

अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियान  दिनांक १३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आले असून विद्यापीठ परिसर तसेच संलग्नित महविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या अभियानात सहभागी होणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यापीठ नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असते. यामुळेच आज काही तासात 2 हजारहून अधिक अवयवदान करणाऱ्या व्यक्तींची नोंद झाली असून पुढील सात दिवसात याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामित सदस्य व विद्यार्थी विकास मंडळ तथा राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी उपक्रम समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी संकटकाळी  विद्यार्थ्यांची  कृतिशीलता व समाजोपयोगी बाबीत पुढे होऊन उत्साहाने काम करण्याच्या सकारात्मक योगदानाविषयी राज्यपाल महोदयांना माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here