विधानपरिषद लक्षवेधी

0
9

गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षातून किमान १८० दिवस काम देण्याचे नियोजन करणार  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २८ : गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षातून किमान १८० दिवस काम देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत असून गृहरक्षक दल स्वयंसेवकांच्या मानधनावरील खर्चाकरिता अर्थसंकल्पामध्ये ३५० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केली होती. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गृहरक्षक दल स्वयंसेवकांच्या मानधनावरील खर्चाकरिता सन 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये रु. 350 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी रु. 297.50 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून प्रत्यक्षात रु. 243.31 कोटी खर्च झालेला आहे. तसेच सन 2023-24 मध्ये रु. 350 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून माहे एप्रिल 23 ते जुलै 23 पर्यंत रु. 105 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी रु. 63.62 कोटी इतका खर्च झालेला आहे. गृहरक्षक दलाच्या मागण्यांवर शासनाने बैठका आयोजित करुन योग्य ती आवश्यक कार्यवाही करुन सर्व मागण्यांचे निराकरण केलेले आहे. बॉम्बे होमगार्ड ॲक्ट 1947 मध्ये सुधारणा अथवा बदल करणेबाबत प्रस्ताव दि. 03.04.2023 अन्वये केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

000

स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.२८: राज्यातील स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या प्राध्यापक भरती आणि अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

या संदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी  लक्षवेधी सूचना मांडली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्याने प्राध्यापक भरती आणि  महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासन कार्यवाही करीत आहे. सन २००१ पूर्वी स्थापना झालेल्या ८९ शिक्षणशास्त्र (बी.एड.) महाविद्यालय,२००१ च्या पूर्वीची सर्वसाधारण कला वाणिज्य आणि विज्ञानाची ७८ महाविद्यालय, आदिवासी भागातील महाविद्यालय, नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालय, अल्पसंख्याक महाविद्यालय, डोंगरी भागातील विद्यालय, अशा सात ते आठ वर्गवारीतून अनुदानाचा, प्राध्यापक भरतीचा विषय पूर्ण करीत आहोत. या सर्व कामासाठी 900 कोटी रूपयांचा वित्तीय भार पडत आहे. या सर्व  प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

जॉन्सन बेबी पावडर कंपनीवर कारवाई करण्यात दिरंगाई नाही – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

मुंबई, दि.२८ : “जॉन्सन बेबी पावडर” यांच्या उत्पादनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती चौकशी करून राज्य शासनाने त्याचे उत्पादन तत्काळ बंद केले आहे याबाबतीत कुठेही दिरंगाई झाली नसल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत दिली.

यासंदर्भात लक्षवेधी सूचना सदस्य सुनिल शिंदे यांनी मांडली होती. मंत्री श्री. आत्राम म्हणाले की,  मे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व त्याखालील नियमाअंतर्गत सौंदर्य प्रसाधने उत्पादन परवाना धारण करत होती. उच्च न्यायालयाने ११/०१/२०२३ च्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाने उत्पादन बंदीचे पारीत केलेले आदेश रद्द केले होते. त्यानंतर, मे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन प्रा. लि. यांनी स्वतःहून निर्णय घेवून उत्पादन परवाना दि.२२.०६.२०२३ रोजी अन्न व औषध प्रशासनास (Surrender) प्रत्यार्पित करून “जॉन्सन बेबी पावडर” याचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात बंद केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५ मधील तरतूदीचे उल्लंघन केल्यास त्याबाबत कंपनीकडून नुकसान भरपाई घेण्याची तरतूद नाही असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

0000

दत्ता कोकरे/विसंअ

 

पुसेगाव/नेर येथील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसींचे शिक्के काढून टाकण्याबाबत शासन सकारात्मक  उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 28 : पुसेगाव/नेर ता.खटाव, जि. सातारा येथील शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ‘एमआयडीसी’चे शिक्के काढून टाकण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुसेगाव/नेर ता.खटाव, जि. सातारा येथील शेतकऱ्यांचा ‘एमआयडीसीसाठी’च्या भूसंपादनास पूर्वीपासूनच विरोध असल्याने तसेच येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी याबाबत निवेदने दिली असून याठिकाणी शेतीसाठी पाणीपुरवठ्याची सोय करुन बागायती पिके केली असल्याने एमआयडीसीसाठीचे भूसंपादन रद्द करावे, यासाठी एमआयडीसीकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

000

दत्ता कोकरे/विसंअ

 

म्हाडाकडून सहा महिन्यात भूखंड वाटपाचे नियोजन  गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 28 : म्हाडाच्या नागपूर विभागीय मंडळाकडून संबंधितांना पुढील सहा महिन्यात भूखंड वाटप करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

याबाबतची सदस्य अभिजित वंजारी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.  मंत्री श्री. सावे म्हणाले की, म्हाडा नागपूर विभागांतर्गत पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील गोधणी रोड येथे म्हाडाद्वारे विकसित भूखंडाकरिता 20 जुलै 1995 रोजी वर्तमानपत्रामधील जाहिरातीनुसार अर्ज मागविण्यात आले होते. याबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ख.क्र.456, 457/2 वर 160 भूखंडाचे व खसरा क्र.445, 446 वर 92 भूखंडाचे वाटप पुढील सहा महिन्यात करण्याचे नियोजन म्हाडाच्या नागपूर मंडळाने केले असल्याची माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.

0000

दत्ता कोकरे/विसंअ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांच्या पुनर्वसनासाठी दोन्ही सदनातील सदस्यांची समिती – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 28 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन क्षेत्रावर झालेल्या अतिक्रमणातील पात्र अतिक्रमकांचे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुनर्वसन केले जात आहे. त्यांच्यासाठीची घरे बांधून पूर्ण होईपर्यंत विधिमंडळाच्या दोन्ही सदनातील संबंधित सदस्यांची समिती तयार केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य राजहंस सिंह यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, उच्च न्यायालयाने 7 मे 1997 च्या आदेशानुसार संजय गांधी उद्यानातील दिनांक 1 जानेवारी 1995 पूर्वीच्या अतिक्रमकांचे उद्यानाबाहेर पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या अतिक्रमकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यात आली होती. त्यानुसार संघर्षनगर, चांदिवली येथे 11 हजार 385 पात्र अतिक्रमकांचे पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित पात्र अतिक्रमकांची पुनर्वसन प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्कालीन पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 13 जानेवारी 2022 च्या बैठकीतील निर्देशानुसार पर्यायी क्षेत्र निश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत गृहनिर्माण व नगरविकास विभाग यांना कळविण्यात आले आहे. यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील म्हाडाची घरे पूर्ण करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या डीबी रिअल्टी या कंपनीची निविदा तपासून तात्काळ रद्द करण्याच्या सूचना व शिफारस वन विभाग, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला देईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, महादेव जानकर, राजेश राठोड यांनी सहभाग घेतला.

बी.सी.झंवर/विसंअ/

000

सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन वेळेत देण्यासाठी उपाययोजना

करणार – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 28 : जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान वेळेत होण्यासाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि वित्त विभागामध्ये समन्वय साधून पुढील अधिवेशनापूर्वी कायमस्वरूपी कार्यप्रणाली अंमलात आणली जाईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य नरेंद्र दराडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, जिल्हा परिषदांना निधी वाटप, जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतन देयके कोषागारात सादर करणे व अंतिमत: जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान करणे या कार्यपद्धतीकरिता लागणाऱ्या कालावधीमुळे निवृत्तीवेतन अदा करण्याच्या प्रक्रियेस विलंब होत आहे. हा विलंब टाळण्यासाठी समन्वयाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

बी.सी.झंवर/विसंअ/

000

 

लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी अधिक उमेदवारांना संधी देण्याबाबत

विधान परिषद उपसभापतींकडे बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रमाण देशपातळीवर सारखे आहे. त्यात राज्यात बदल करता येणार नाही. तथापि या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी विधान परिषद उपसभापती यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांसमवेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, 8 ऑक्टोबर 2022 रोजी 823 पदांकरीता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तृतीयपंथी उमेदवारांच्या आरक्षणाबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने या परीक्षेचा निकाल उशीरा जाहीर झाला. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रमाण देशभर एकसारखी असल्याने त्यात वाढ करता येणार नाही. इतर पदांवर नियुक्ती झाल्यास या परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची संधी उमेदवारांना मिळत असल्याने त्यानंतरच्या उमेदवारांना आपोआप संधी प्राप्त होते, असेही त्यांनी याअनुषंगाने उपस्थित उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बी.सी.झंवर/विसंअ/

000

 

लिंगमळा (लालमाती वस्ती) चा खुलताबाद नगरपरिषदेत

समावेश करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 28 : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद नगरपरिषदेच्या मंजूर विकास योजना 2019 नुसार लिंगमळा (लालमाती वस्ती) हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट नाही. शहर हद्दीपासून ही वस्ती तीन किमी अंतरावर असून या वस्तीचा नगरपरिषदेत समावेश करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या वस्तीमध्ये मागासवर्गीय समाजाची साधारणत: 25 ते 30 कुटुंबे राहत असून त्यांची लोकसंख्या 158 इतकी आहे. खुलताबाद नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक.1 मध्ये लिंगमळा वस्तीमधील नागरिकांची मतदार यादीत नावे आहेत. नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून या वस्तीस मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

बी.सी.झंवर/विसंअ/

000

 

 

कर्करोग रुग्णालयाच्या दर्शनी भागावर‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’

यांच्या नावाचा फलक लावला – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 28 : माझगाव येथील मे.कॅनकेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत उभारण्यात येणाऱ्या कर्करोग रुग्णालयाच्या दर्शनी भागावर ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हेड ॲण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ असा नामफलक आजच लावण्यात आला असल्याची माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य राम शिंदे यांनी या रुग्णालयाच्या नावामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा उल्लेख करण्याबाबत 23 एप्रिल 2018 रोजी झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर आजच हा फलक लागल्याची माहिती, मंत्री श्री.सामंत यांनी दिली.

बी.सी.झंवर/विसंअ/

000

राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळला

जाणार नाही – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 28 : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये समावेश असलेल्या राजपूत भामटा या जमातीतील ‘भामटा’हा शब्द वगळला जाणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे खोट्या जात प्रमाणपत्रांबाबत एसआयटी नेमली जाईल आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्यासंदर्भात शासनाच्या भूमिकेबाबत सदस्य राजेश राठोड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सावे म्हणाले की, 1961 मधील शासन निर्णयात तसेच त्यानंतर 1993 मध्येही राजपूत भामटा जमातीचा उल्लेख आहे. त्यानंतर सन 2008 आणि 2010 मध्ये मागासवर्ग आयोगानेदेखील यातील भामटा शब्द काढता येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे हा शब्द वगळला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागामार्फत मॅट्रिकपूर्व, मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या 50 वरून 75 करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, भाई जगताप, नीलय नाईक आदींनी सहभाग घेतला.

 

बी.सी.झंवर/विसंअ/

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here