पावसाळ्यापर्यंत पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम पूर्ण करा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

0
10

नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा)  :- येवला तालुक्यातील सिंचनाच्या वाढीसाठी मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या कामाला सुरुवात झाली आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी अंगुलगांव, न्याहारखेडे खु., नगरसुल येथे दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण कामात एकूण ६३ किमीसाठी ९६ कोटी इतक्या निधीची तरतूद आहे. तर दरसवाडी ते डोंगरगाव एकूण ८७ किमी अंतर विस्तारीकरण, अस्तरीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लक्ष रुपये मंजूर आहेत. पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल , कालव्याखालून जाणारे पाणी यासाठी एचपीडी सुविधा, नदीवरील पूल, कालव्यास गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट आदी कामांचा समावेश आहे. या कामास सुरुवात करण्यात आली असून ३७ किमी ते ६३ किमी येथे मशीनने कालवा लेव्हल काम सुरू आहे. या कामासाठी कर्मचारी कॅम्प आणि प्लॅन्टचे काम सुरू आहे.

तसेच दरसवाडी ते डोंगरगाव या ८८ किमी च्या कामात विस्तारीकरण, काँक्रीटीकरण सह कातरणी शिवारात ३ पुल, बाळापुर, सावखेडे, कुसमडी, नगरसुल, न्याहारखेडे, अंगुलगाव, तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पुल, कुसुर, हडपसावरगाव, वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पुल, वाईबोथी व न्याहारखेडे येथील नदीवरील ये जा करण्यासाठीचे मोठे २ पुल, बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेतलेले आहेत. या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कालव्याचे सात ठिकाणी एकाच वेळी काम सुरू आहे. या सातही ठिकाणी काँक्रिट प्लांट उभारण्यात आले आहे. तसेच यासाठी २२  एक्सव्हेटर व दहा पेव्हर मशीनसह सुमारे ७०० मजूर काम करत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here