वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघात टाळा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

0
14
सातारा दि ७.(जि.मा.का) : कोणीतरी आपली वाट बघत आहे. याची जाणीव ठेवून वाहने चालवा . वाहन चालविताना कोणतेही व्यसन करू नका. वाहतुकीचे नियम काटेकोर पाळा. यामुळे अपघातांना आळा बसेल असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पोवाईनाका, सातारा येथे  रस्ते सुरक्षा अभियान 2024 निमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आरोग्य शिबिरात रक्तदान, रक्तदाब, मधुमेह व नेत्र तपासणी करण्यात आली. याशिबीरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे , आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, श्रीपाद जाधव, धैर्यशील कदम , विक्रम पावस्कर, सुनील काटकर, मनोज घोरपडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रस्त्यांची गुणवत्ता वाढल्यामुळे वाहनांचा वेग वाढवला जात आहे. त्यातून अनेक अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा अभियान हे मिशन मोडवर प्रभावीपणे राबवा, असे सांगून मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, रस्ते सुरक्षा अभियानामध्ये वाहन चालकाची दृष्टी दरमहा तपासली पाहिजे. काही दोष असल्यास त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत. पंतप्रधान सडक योजनेत रस्त्यांचे उत्तम स्टॅंडर्ड तयार करून देण्यात आले आहे. त्यामुळे गावापासून शहरापर्यंत येणारे रस्ते कशाप्रकारे समृद्धी आणू शकतात , हे आपण पाहत आहोत . येणाऱ्या काळातही असेच उत्तम रस्ते करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आ.महेश शिंदे म्हणाले, विकसित देशांमध्ये ज्या दर्जाचे रस्ते आहेत त्या दर्जाचे रस्ते आपल्याकडेही व्हावेत यासाठी तांत्रिक समितीला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. दर्जा बदलासाठी रस्ता बांधणीसाठीची स्पेसिफिकेशन्स बदलणे आवश्यक आहे.
आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मतदार संघातील व जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे अधिक चांगले व्हावे , यासाठी जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा. रस्त्यांवरील अपघातात टाळण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये जनजागृती करावी. ड्रायव्हिंग लायसन्स देत असताना उमेदवाराच्या कौशल्याची कसून चाचणी व्हावी. जिल्हा परिषदेच्या दर्जांचीही गुणवत्ता वाढावी, अशी आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संतोष रोकडे यांनी सातारा जिल्ह्यातील रस्त्यांच्या संदर्भातील ब्लॅक स्पॉटचे विविध उपायोजना करून निरसन करण्यात आले, असल्याचे सांगितले. यावेळी चांगली कामगिरी करणारे वाहन चालक आणि अभियंते यांचा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी विविध स्तरातील अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here