आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0
12

नाशिक, दिनांक : 15 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार दिव्यांगांसाठी सातत्याने कार्यरत आहे. याअनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक जिल्ह्यातील एक हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर आमदार प्रा. देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) चे व्यवस्थापक अजय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, संपूर्ण देशात ६९ ठिकाणी “सामाजिक अधिकारीता शिबिराचे” आयोजन करण्यात आले असून या शिबिरांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  या शिबिरासाठी एलिम्कोच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती.

या शिबिरांमध्ये दिव्यांग बांधवांना नोंदणी करता यावी यासाठी प्रशासनामार्फत तंत्रज्ञानाचा वापर करून एक ॲप्लीकेशन विकसीत करण्यात आले आहे, ही कौतुकाची बाब आहे. या ॲप्लीकेशन मध्ये नोंदणी केल्यानुसार दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार एलिम्को कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य तयार केले आहे. दृष्टिबाधित दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन (काठी) तयार केली आहे. या काठीचा वापर करतांना 3 मीटर अंतरावर असलेल्या अडथळ्यांची सूचना संबंधित दिव्यांग व्यक्तीला मिळणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. एलिम्को कंपनी मार्फत देण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांनी जाणून घ्यावी, ज्यामुळे सहाय्यक साहित्याचा वापर करणे सहज शक्य होईल.म्हणूनच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांना त्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून कोणीही दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी केंदीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल यांनी सांगितले, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 26 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती. त्यातील पात्र ठरलेल्या एकूण दोन हजार 287 लाभार्थ्यांपैकी जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, देवळा, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड व येवला या 10 तालुक्यातील एक हजार 397 लाभार्थ्यांना साधारण 7 ते 8 कोटी रुपयांच्या कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित ५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना नंतरच्या टप्प्यात कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग व्यक्ती व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरेल असे दर्जेदार साहित्य त्यांना पुरविण्यात आले आहे. त्याचा उपयोग त्यांनी कसा करावा याबाबतची माहिती देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एलिम्को कंपनीचे व्यवस्थापक अजय चौधरी यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येकी दोन इलेक्ट्रीक ट्रायसिकल, व्हिल चेअर, श्रवण यंत्र, दृष्टिबाधितांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन (काठी) साहित्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करून योग्य कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.

00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here