छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव या भूमीवर आचंद्रसूर्य असणार आहे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
7

जळगाव दि. 18 (जिमाका) -छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव इथे आचंद्रसूर्य असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आपण पुस्तकात वाचतो पण ‘जाणता राजा ‘ हे महानाट्य पाहताना तो पराक्रम जिवंत होतो. त्यामुळे ‘जाणता राजा’ हे महानाट्य अनुभवायलाच हवं, उद्या आणि परवा दोन दिवस जिल्ह्यातील शिवप्रेमींनी ते अनुभवावं असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

     छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला पोलीस कवायत मैदान येथे ‘जाणता राजा ‘ या महानाट्याची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरतीने सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी सोपान कासार यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे संघर्षमय आणि प्रेरणा देणारे असल्याने त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘जाणता राजा’  हे महानाट्य प्रत्येक मराठी माणसाला आणि शिवप्रेमी माणसाला प्रेरणा देत असते.

     जळगावमध्ये याआधीदेखील ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग झाला होता, त्यावेळीदेखील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची आठवण पालकमंत्र्यांनी यावेळी करून दिली. हा सुंदर उपक्रम सुरू केल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. जळगाव शहरात आयोजन करण्यात आलेल्या या महानाट्याचा लाभ जळगावकरांनी घ्यावा,असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here