‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखांवर नोंदी; जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर योजना राबवा..! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
11

जळगाव दि. 16 ( जिमाका )  जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुकास्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा – सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून  मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर योजना राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.  तर या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वॉर्डनिहाय  नियोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीच्या सुरुवातीला या योजनेचे सादरीकरण केले. त्यात या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या योजनेसाठी केलेल्या नियोजनाची तालुका निहाय माहिती दिली.  जिल्हा परिषद सभागृहात आज ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा’  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,मनापा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , जिल्हा स्तरावरील आणि तालुकास्तरावरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या योजनेसाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, नपा चे मुख्याधिकारी, बाल विकास परियोजना अधिकारी यांची महत्वाची भूमिका असून यांच्यातील समन्वयाने जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबावायची आहे. ग्रामीण भागात प्रशासनाचे मनुष्यबळ आहे तुलनेनी नागरी भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ऑनलाईन फॉर्म घेण्याचा आग्रह करण्यापेक्षा अधिक भर ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यावर द्यावा, त्यानंतर ते फॉर्म ऑनलाईन करून घेण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. आपण पुढच्या आठवड्यापासून प्रांतस्तरावर जाऊन प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

तालुका स्तरावरील समित्या स्थापन करणार

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करायच्या असून त्यात समित्या तात्काळ करणार आहे, जेणे करून अधिक गतीने हे काम होईल असे पालकमंत्री गुलबराव पाटील यावेळी म्हणाले. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील यांनीही सूचना केल्या. आपापल्या तालुक्यात ही योजना कशी यशस्वी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here