मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्याच्या विविध भागातील पाऊसपाणी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

0
11

मुंबई, दि. २५ :- खडकवासला धरणाची क्षमता पावणे तीन टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण अगोदरच ५० टक्के भरले होते. त्यातच काल दिवसभर आणि रात्री खडकवासला धरणाच्या वरच्या क्षेत्रात ८ इंच आणि पाणलोट क्षेत्रात ५ इंच पाऊस पडला आहे. साधारण ७५ टक्के धरण भरल्यानंतर त्यातून पाणी सोडले जाते. मात्र, धरणाच्या वरच्या भागातून तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी धरणात आले आहे. त्यामुळे खडकवासल्याच्या बाबतीत अशी संधी मिळाली नाही. झोपेत असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खडकवासला धरणाचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्यातील विविध भागातील पाऊस-पाणी, पूरस्थितीचा आढावा घेतला. मंत्रालयातील सर्व बैठका रद्द करून यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्व करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरासह पाऊस जास्त असणाऱ्या भोर, वेल्हा, मुळशी भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वरसगाव, टेमघर, खडकवासला, पानशेत या धरणात यापूर्वी पाणी कमी असल्यामुळे शहराला काही काळ पुरेल एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे त्यातून पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता या धरणक्षेत्रामध्येही पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून नागरिकांना अलर्ट करण्यात येत आहे. मुळशी परिसरात दरड कोसळली आहे, तर काही भागात जीवित हानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पूरपरिस्थिती आणि बचावकार्याविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खडकवासला परिसराबरोबच पुणे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. पुणे शहर परिसरात डांबरी रस्ते, क्राँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. वन विभागाच्या जमिनी, टेकड्या, शासकीय इमारतींचा परिसर सोडला तर इतर ठिकाणी मोकळ्या जागा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाली होते. शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पाणी वहन क्षमता ठरलेली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नदीकाठावरील काही परिसरात, नगररोड, एकतानगर यासारख्या सखल भागात पाणी साचले आहे. या भागातील इमारतींमध्ये, वाहनतळ परिसरात, वाहनांमध्ये पाणी शिरले आहे. इमारतीच्या वरच्या भागात नागरीक सुरक्षित आहेत, त्यांना खाली येण्याचे आवाहन करून सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे.

सध्या नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूरपरिस्थितीतून नागरिकांचा बचाव करण्याची कर्यवाही युद्धपातळीवर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी पूरग्रस्त भागात पोहोचले आहेत. माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून मदत व बचाव कार्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. नागरिकांच्या मदत व पुनर्वसनासाठी सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विविध ठिकाणी मदत व बचावकार्य सुरु आहे.

हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here