आपत्ती काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
9

सातारा, दि. 25: सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य माणसांची कोणत्याही स्थितीत गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. दरडप्रवण क्षेत्र, भूस्खलन बाधित क्षेत्र या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे त्वरित स्थलांतर करण्यात यावे. पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे वर्तविण्यात आले असून यंत्रणांनी 24X7 सतर्क राहावे. कोणत्याही स्थितीत नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात अतिवृष्टीबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासह प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी दृरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर गर्दी होते हे लक्षात घेऊन  धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी करावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा ठिकाणी पोलीस पेट्रोलींग वाढवावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवावा. दिवसा तसेच विशेषत: रात्रीच्या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची कार्यस्थळावर उपस्थिती बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी आवश्यक कार्यवाही करुन वाहतूक सुरळीत करण्यात यावी. भूस्खलन प्रवण तसेच दरड प्रवण क्षेत्रामध्ये कोणत्याही स्थितीत नागरिक राहणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना आवश्यकता भासल्यास सक्तीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी धोकादायक गावांना भेटी द्याव्यात. पोलीस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल यांनी मुख्यालय ठिकाणी राहण्याच्या सूचनाही दिल्या.

घरांची पडझड, गुरांचे गोटे, मयत पशुधन इत्यादींचे पंचनामे तात्काळ करुन आर्थिक मदतीसाठी अहवाल सादर करावेत. दुर्घटना घडून व्यक्ती मयत झाल्यास वारसांना त्वरित मदतीचे वाटप करावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. स्थलांतरित केलेल्या ठिकाणी अन्न, पिण्याचे पाणी अनुषंगीक प्राथमिक सुविधांचे नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

ज्या ठिकाणी रस्ते, पुल पाण्याखाली जातात त्या ठिकाणी आवश्यक बॅरेकेटींग करुन लोकांना जाण्यास प्रतिबंध करावा. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्वरित सुरळीत करण्यात यावा. जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या झाल्या असून ज्या भागात पावसाने नुकसान झाले आहे त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करावे. मोठ्या पावसामुळे ओढ्याचे पात्र बदलते त्यांचे प्रवाह शेतात जाऊन शेतीचे नुकसान होते अशा नुकसानीचेही पंचनामे तात्काळ करावेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा व आवश्यकता भासल्यास शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वस्थितीत यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने, संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जिल्ह्यात आत्तापर्यंत 143 टक्के पाऊस झाला असून एकूण सरासरीच्या 66.8 टक्के हा पाऊस आहे. सद्यस्थितीत सर्व प्रमुख धरणे 70 टक्के भरली आहेत. कोयना धरणातून 11 हजार क्युसेक्स तर कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला पुढील दोन दिवस रेड अलर्ट व त्यानंतर चार दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, अशी माहिती बैठकीत दिली. यावेळी त्यांनी आपत्ती काळात नागरिकांच्या सुरिक्षतेसाठी व मदतीसाठी प्रशासन सज्ज असून प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपायोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना अडचण सल्यास तत्काळ दूरध्वनी संपर्क साधावा. त्यांना तात्काळ मदत पुरविण्यात येईल. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले दूरध्वनी बंद ठेवू नयेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here