चिखलदरा पर्यटनस्थळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

0
11

भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 16 (जिमाका): विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग, सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात. त्‍यामुळे चिखलदऱ्यामध्ये पर्यटकाला अधिक आकर्षक करण्यासाठी पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी निर्माण करुन देऊ, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसिलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे, सुधीर शेटे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, चिखदऱ्यातील पर्यटकांना व निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आमझरी येथे ‘निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’, गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील ‘निसर्गानुभव मचाण’ व  भीमकुंड येथील ‘साहसी खेळ’ अशा उपक्रमामुळे येथे निश्चितच पर्यटकाच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होईल. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याच्या महसुल वाढण्यास निश्चितच मदत होईल. पर्यटन स्थळावर मुलभूत सुविधा निर्माण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व सी.एस.आर. फंडच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देणाचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राध्यान्य द्यावे. या भागात जास्त उत्पादन होणाऱ्या पिकांचे राष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग व ब्रॅन्डिग करुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आराखडा तयार करावा. यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी शेती पिकावरच अवलंबून न राहता जोडधंदाचा पर्याय स्वीकारावा. चिखलदरा क्षेत्रामध्ये पर्यटनाला मोठी संधी असून त्याचा लाभ आदिवासी युवक-युवती व शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here