राज्य शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
179

आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ठाणे, दि.18(जिमाका): एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले.

ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर,  उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, मुंबई पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, हे शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. लाडकी बहीण योजना यशस्वी करुन दाखविली. इतर योजनाही यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने जलद गतीने कामे सुरु आहेत. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई मधील दोन तासाचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांवर आले आहे. महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प आम्ही साकार करीत आहोत. राज्य शासनाने दाओसमध्ये पाच लाख करोडच्या उद्योग करारांवर सह्या केल्या आहेत. लोकांच्या हातांना निश्चित काम मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर युनिटमध्ये 400 लोकांना काम मिळणार आहे. या माध्यमातून अडॅव्हान्स टेक्नोलॉजी आपल्या राज्यात येत आहे. हे  शासन सर्वांसाठी आहे. उद्योजकांना सबसीडी देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणली आहे.

लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेत, आणखी येत आहेत. शेतकऱ्याला केंद्र बिंदू मानून हे शासन काम करीत आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला चांगले सहकार्य लाभत आहे.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सेमिकंडक्टर हा भारतातला पहिला प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरु होत आहे, याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा हा प्रकल्प सुरु केला. सुरुवात करणारा महत्वाचा असतो. आपण आपला भारत देश सामर्थशाली घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यासाठी ही चिप खूप महत्वाची आहे. आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो. पण जे रियल हार्डवेअर आहे, त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी कमतरता भासत होती. आणि विशेषत: भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आले की, ग्लोबल सप्लायर चैन खंडित झाली. चीन, जपान यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि तत्सम गोष्टी या त्यांच्याच देशातून येतात. जगातील बहुतांश देश त्यांच्यावरच अवलंबून होते. आपल्या देशाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचे असेल तर आपल्या देशात हा उद्योग नियोजनबध्दरित्या वाढवावा लागेल. मला या गोष्टीचा आनंद आहे की, सेमिकंडक्टर क्षेत्रामध्ये आपले स्वत:चे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ज्या प्रकारे डिजिटायझेशन झपाट्याने वाढत आहे, त्याच प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टिम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते आहे.  उद्योग क्षेत्रातील येणारा काळ हा भारतासाठी उज्ज्वल असणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले की, सेमिकंडक्टर प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्यातील उद्योगाला गती मिळणार आहे. महाराष्ट्रासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. डिजिटल क्रांतीला गती मिळणार आहे. इच्छा शक्तीच्या जोरावर हा प्रकल्प उभा राहिला आहे. महाराष्ट्राला उद्योगाची परंपरा आहे. राज्याच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. हा प्रकल्प औद्योगिक विकासासाठी महत्वाचा असणार आहे. उद्योग क्षेत्राला गती देण्याचे निर्णय सरकारने घेतले आहेत. उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगासाठी अनेक प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये 12 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्तावित करताना आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोडणकर यांनी या प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि असे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कायम सहकार्य करण्याची हमी दिली.

या कार्यक्रमासाठी विविध उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here