सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

0
389

मुंबई, दि. २६ :- खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप   ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे .

हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून  जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदारांपैकी  ६८ लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांचे ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख खातेदार यांनी  २५ सप्टेंबर २०२४ अखेर ई-केवायसी पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करतील. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रीकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सीएसी (CSC) जावून सुद्धा ई-केवायसी करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेट्स (Disbursement status) येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त ओटीपी किंवा सीएसी केंद्रातील बायोमेट्रीक मशिनच्या माध्यमातून ते ई-केवायसी पूर्ण करु शकतात. तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here