रत्नागिरी : जिल्ह्यात ०३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे मंडणगड आणि दापोली तालुक्यांमधील नुकसान तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले नुकसान याबाबत माहिती दिली.
मंडणगड विश्रामगृहावर पथकाचे आगमन झाले त्यावेळी शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकातील सदस्य सहसचिव (प्रशासन व सीबीटी), एनडीएमच, एमएचए, नवी दिल्ली श्री.रमेशकुमार गंटा (भाप्रसे), सल्लागार अर्थ मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली श्री.आर.बी.कौल, संचालक, उर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली श्री.एल.आर.एल.के.प्रसाद, उपसचिव, ग्रामीण विकास, नवी दिल्ली श्री.एस.एस.मोदी, संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर श्री.आर.पी.सिंग, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग, मुंबई श्री.तुषार व्यास उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांना सूचना दिल्या, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घेण्यात यावी. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईने नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करावा.
निसर्ग चक्रीवादळाच्या या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली, संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले, तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. त्यात बऱ्याच अंशी यश मिळाले आहे. गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपविभागीय अधिकारी शरद पवार आदी उपस्थित होते.