आजपर्यंतची मराठी साहित्य संमेलने

केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्णय जाहिर करून आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. महाराष्ट्र हे मराठी भाषिकाचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्या मायमराठीचा जागर करण्यासाठी सज्ज झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे हे देखील मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे. मराठी साहित्य हे आपल्या संस्कृतीचे सजीव प्रतीक आहे ज्याने काळानुसार समाजाला मार्गदर्शन केले आहे. मराठी साहित्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तिप्रधान आणि लोकप्रबोधन करणाऱ्या विचारांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लोकचळवळदर्शी लेखनापर्यंत आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर आधारित जीवनदर्शनापर्यंत अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. मराठी लिहिणाऱ्यांनी भाषेचे माधुर्य दाखवताना प्रबोधनपर लेखनात मराठी वज्रासारखी किती कठीण होते हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. समाजाला विचारशील बनवण्याचे कार्य केले आहे. प्रत्येक पिढीतील बदलांना आपलेसे करण्याचे औदार्य मराठी साहित्यातून प्रकट होत आले आहे. समाजातील सर्व घटकांची भाषा आत्मसात करताना साहित्य अधिक समृद्ध आणि समकालाशी सुसंगत करणारी तरूण पिढी निर्माण होत राहिली हे मराठीचे भाग्यच आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यिकांना जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डिजिटल माध्यमातून मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. मुलांचाच नव्हे तर पोक्त पिढीचाही स्क्रीन टाईम वाढत असताना या सर्वांना पुन्हा एकदा साहित्याकडे वळविणे हे सोपे काम नाही याची जाणीव आहे. त्यासाठी नव्या प्रयोगांची आवश्यकता आहे. साहित्य संमेलनातून होणाऱ्या परिसंवादातून आणि चर्चांतून याबाबत उहापोह केला जाईल असा मला विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केला.

सुमारे २००० वर्षांपासूनची आपली भाषिक परंपरा एकविसाव्या शतकापर्यंत अव्याहत चालत आलेली आहे. हाल सातवाहनाने तत्कालीन लोकसाहित्यातील महाराष्ट्री प्राकृतातील गाथांचा संग्रह करून गाहा सतसई (गाथा सप्तशती) हा ग्रंथ रचला. ह्या लोकभाषेच्या प्रवाहाला विविध धर्मपंथाच्या साहित्याने समृद्ध केले. लीळाचरित्र आणि त्यापासून सुरू झालेली महानुभावीय साहित्याची सघन परंपरा ज्ञानदेवी एकनाथी भागवत विविध संतांची अभंगवाणी आणि त्यावर तुकाबारायांच्या अभंगगाथेने चढवलेला कळस ह्यांमुळे तुकोबांच्या गाथेप्रमाणेच मराठी भाषाही लोकगंगेच्या प्रवाहासोबत वाहती राहिली. पंडित कवी आणि शाहिरांनी तिला नटवले. शिवछत्रपतींनी तिला राजभाषेचा सन्मान दिला. सामर्थ्य दिले. एकोणिसाव्या शतकात अन्य भाषांशी आणि साहित्यप्रवाहांशी संपर्क आल्याने अभिव्यक्तीच्या अनेक विधा तिने आत्मसात केल्या. पारतंत्र्यात तिने स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत ठेवली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाही बळकट करण्यासाठी ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा होऊन नागरिकांच्या अभिव्यक्तीचा आधार बनली आहे. आत्मबोधापासून समाजप्रबोधनापर्यंत आणि मनोरंजनापासून अन्यायनिर्मूलनापर्यंतची विविध वैयक्तिक आणि सामाजिक कार्ये पार पाडण्यासाठी आपली भाषा आपल्याला सक्षम करत आलेली आहे. लोकांच्या अभिव्यक्तीतून साकारलेल्या मराठी भाषेच्या साहित्याचा उत्सव आपण साजरा करत असताना त्या उत्सवाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोकसंस्कृती आणि लोककला ह्यांच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर ह्यांची निवड होणे हा एक सुखद योग जुळून आला आहे. बालकाला आत्मसात होणाऱ्या पहिल्या भाषेला मायबोली अथवा मातृभाषा म्हणतात हा केवळ योगायोग नाही. भाषेच्या आणि संस्कृतीच्या विकासात स्त्रियांचा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या अभ्यासातून ह्या योगदानाचा साक्षेपाने आढावा घेणाऱ्या डॉ.भवाळकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे संमेलन मराठी साहित्य मराठी भाषा ह्यांच्या पुढील वाटचालीत निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान संपन्न होत आहे. या गौरवास्पद संमेलनाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हे संमेलन मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरते.

मराठी भाषा आणि साहित्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने हे संमेलन विशेष महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध नामवंत साहित्यिक कवी विचारवंत अभ्यासक तसेच नव्या पिढीतील साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात विविध चर्चासत्रे परिसंवाद कवी संमेलने ग्रंथप्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठीतून करण्याची परंपरा त्यांनी ठेवली आहे. ही बाब त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेम आदर आणि आपलेपणाचा उत्तम प्रत्यय देणारी आहे. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये मराठी संस्कृती आणि साहित्याच्या समृद्ध वारशाचे कौतुक केले आहे. मराठी ही केवळ महाराष्ट्राची भाषा नसून ती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचा एक अभिमानास्पद भाग आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीमुळे या संमेलनाचे महत्त्व आणखी वाढले असून मराठी साहित्याचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. हे संमेलन मराठी भाषा आणि साहित्याची महती वाढवण्यास मोठे योगदान देईल. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाला नवी प्रेरणा मिळेल आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होण्यास चालना मिळेल. मराठी भाषा आणि साहित्याच्या गौरवशाली वारशाचा जागर करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या या ९८व्या सम्मेलनांबरोबर मागील सम्मेलनाची माहिती घेऊ या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली सन १८७८ पुणे येथे पहिले अखिल भारतीय साहित्य सम्मेलन भरविण्यात आले होते. त्यानंतर दुसरे सम्मलेन १८८५ साली कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे तर १९०५ साली सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे मराठी साहित्य सम्मेलन पार पडले.

चौथे सम्मलेन १९०६ पाचवे सम्मलेन १९०७ आणि सहावे सम्मेलन १९०८ साली पुणे येथे मराठी साहित्य सम्मेलने पार पडली. या सम्मेलनाचे अनुक्रमे वासुदेव गोविंद कानिटकर विष्णु मोरेश्वर महाजन आणि चिंतामण विनायक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर १९०९ साली बडोदे येथे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर १९१२ साली अकोला येथे हरी नारायण आपटे आणि १९१५ साली मुंबई येथे गंगाधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य सम्मेलन यशस्वीरित्या संपन्न झाले. सन १९१७ साली दहावे मराठी साहित्य सम्मेलन हे इंदूर येथे गणेश जनार्दन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली अकरावे मराठी साहित्य सममेलन बडोदे येथे १९२१ साली संपन्न झाले. १९२६ साली मुंबई येथे माधव विनायक किबे १९२७ साली पुणे येथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर १९२८ साली ग्वाल्हेर येथे माधव श्रीहरी अणे १९२९ साली बेळगाव येथे शिवराम महादेव परांजपे १९३० साली मडगाव येथे वामन मल्हार जोशी १९३१ साली हैदराबाद येथे श्रीधर व्यंकटेश केतकर १९३२ साली कोल्हापूर येथे महाराजा सयाजीराव गायकवाड १९३३ साली नागपूर येथे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर तर १९३४ साली बडोदे येथे नारायण गोविंद चापेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य सम्मेलन पार पडले.

एकविसावे मराठी सम्मेलन हे १९३५ साली इंदूर येथे भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १९३६ साली जळगाव येथे माधव जुलियन/माधव त्रिंबक पटवर्धन १९३८ साली मुंबई येथे विनायक दामोदर सावरकर १९३९ साली अहमदनगर येथे दत्तो वामन पोतदार १९४० साली रत्नागिरी येथे नारायण सीताराम फडके १९४१ साली सोलापूर येथे विष्णू सखाराम खांडेकर १९४२ साली नाशिक येथे प्रल्हाद केशव अत्रे १९४३ साली सांगली येथे श्रीपादा महादेव माटे १९४४ साली धुळे येथे भार्गवराम विठ्ठल वरेरकर १९४६ साली बेळगाव येथे गजानन त्र्यंबक माडखोलकर १९४७ साली हैदराबाद येथे नरहर रघुनाथ फाटक १९४९ साली पुणे येथे शंकर दत्तात्रय जावडेकर १९५० साली मुंबई येथे यशवंत दिनकर पेंढारकर/कवी यशवंत १९५१ साली कारवार येथे अनंद काकबा प्रियोळकर १९५२ साली अमळनेर येथे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी १९५३ साली अहमदाबाद येथे वि.द.घाटे १९५४ साली दिल्ली येथे लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी १९५५ साली पंढरपूर येथे शंकर दामोदर पेंडसे १९५७ साली औरंगाबाद येथे अनंत काणेकर आणि १९५८ साली चाळीसावे मराठी साहित्य सम्मेलन हे मालवण येथे अनिल/ आत्माराम रावजी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
एकेचाळीसावे मराठी साहित्यस संमलेन १९५९ साली मिरज येथे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर १९६० साली ठाणे येथे रामचंद्र श्रीपाद जोग १९६१ साली ग्वाल्हेर येथे कुसुमावती देशपांडे १९६२ साली सातारा येथे नरहर विष्णू गाडगीळ १९६४ साली मडगाव येथे वि.वा.शिरवाडकर/ कुसुमाग्रज १९६५ साली सातारा येथे वामन लक्ष्मण कुलकर्णी १९६७ साली भोपाळ येथे विष्णू भिकाजी कोलते १९६९ साली वर्धा येथे पु.शि.रेगे १९७३ साली यवतमाळ येथे गजानन दिगंबर माडगूळकर आणि १९७४ साली इचलकरंजी येथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पन्नासावे संमेलन संपन्न झाले. पुढील ५१ वे मरराठी साहित्य सम्मेलन हे १९७५ साली कऱ्हाड येथे दुर्गा भागवत १९७७ साली पुणे पु.भा.भावे १९७९ साली चंद्रपूर येथे वामन कृष्ण चोरघडे १९८० साली बार्शी येथे गं.बा.सरदार १९८१ साली अकोला येथे गो.नी.दांडेकर १९८१ साली रायपूर (छत्तीसगढ) येथे गंगाधर गाडगीळ १९८३ साली अंबेजोगाई येथे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर १९८४ साली जळगांव येथे शंकर रामचंद्र खरात १९८५ साली नांदेड येथे शंकर बाबाजी पाटील आणि १९८८ साली साठावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

६१ वे मराठी साहित्य सम्मेलन १९८८ साली ठाणे येथे वसंत कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १९८९ साली अमरावती येथे केशव जगन्नाथ पुरोहित १९९० साली पुणे येथे यू.म. पठाण १९९० साली रत्नागिरी येथे मधू मंगेश कर्णिक १९९२ साली कोल्हापूर येथे रमेश मंत्री १९९३ साली सातारा येथे विद्याधर गोखले १९९४ साली पणजी येथे राम शेवाळकर १९९५ साली परभणी येथे नारायण सुर्वे १९९६ साली आळंदी येथे शांता शेळके १९९७ साली अहमदनगर येथे ना.सं.इनामदार १९९८ साली परळी-वैजनाथ येथे द.मा.मिरासदार १९९९ साली मुंबई येथे वसंत बापट २००० साली बेळगांव येथे य.दि.फडके २००१ साली इंदूर येथे विजया राजाध्यक्ष आणि २००२ साली पुणे येथे राजेंद्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पंचाहत्तरवे मराठी साहित्य सम्मेलन यशस्वीपणे संपन्न झाले.

७६ वे मराठी साहित्य सम्मेलन २००३ साली कऱ्हाड येथे सुभाष भेंडे २००४ साली औरंगाबाद येथे रा.ग. जाधव २००५ साली नाशिक साली केशव मेश्राम २००६ साली सोलापूर येथे मारुती चितमपल्ली २००७ साली नागपूर येथे अरुण साधू २००८ साली सांगली येथे म.द. हातकणंगलेकर २००९ साली महाबळेश्वर येथे आनंद यादव २०१० साली पुणे येथे द.भि.कुलकर्णी २०१० साली ठाणे येथे उत्तम कांबळे २०१२ साली चंद्रपूर येथे वसंत आबाजी डहाके २०१३ साली चिपळूण येथे नागनाथ कोत्तापल्ले २०१४ सासवड येथे फ.मुं.शिंदे २०१५ साली घुमान (पंजाब) येथे सदानंद मोरे २०१६ साली पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्रीपाल सबनीस आणि २०१७ साली डोंबिवली येथे अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर एक्यान्नववे साहित्य सम्मेलन २०१८ साली बडोदे येथे लक्ष्मीकांत देशमुख २०१९ साली यवतमाळ येथे अरुणा ढेरे संपन्न झाले.
९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन हे दिनांक १० ११ १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ९४ वे मराठी साहित्य सम्मेलन दिनांक २६ २७ २८ मार्च २०२१ रोजी नाशिक येथे जयंत नारळीकर आणि ९५वे सम्मेलन दिनांक २२ २३ २४ एप्रिल २०२२ रोजी उदगीर येथे भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ९६ वे मराठी साहित्य सम्मेलन दिनांक ३ ४ ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथे नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर ९७ वे दिनांक २ ३ ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर (जळगाव) येथे रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तर यंदाचे ९८वे अखिल भारतीय मरराठी साहित्य सम्मेलन हे दिनांक २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत डॉ.तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
– संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी
0000